
प्राथमिकच्या स्थानिक शिक्षक उमेदवारांसाठी ८ दिवसात प्रक्रिया
रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील. शिक्षणसेवकांच्या रिक्त पदांवर नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिल्या टप्यात जिल्ह्यात १०६ जणांना नियुक्ती दिली आहे. उर्वरित पदांसाठी तालुक्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. ही प्रक्रिया येत्या ८ दिवसात पूर्ण केली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
जि. प. प्राथमिक शाळांमधीर रिक्त पदी पहिल्या टप्यात शाळा परिसरातील गावातून प्राप्त अर्जानुसार असलेल्या डीएड, बीएड उमेदवारांना प्राधान्य दिले गेले आहे. जि. प. प्राथमिक शाळांमधील रिक्त पदांची संख्या २ हजारावर पोहोचली होती. ६ महिन्यापूर्वी राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ११०० शिक्षकांची नियुक्ती दिली. मात्र या शिक्षणसेवकांच्या नियुक्तीनंतर तातडीने ३५० प्राथमिक शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने सोडण्यात आले. त्यामुळे पुन्हा रिक्त पदांचा प्रश्न गंभीर झाला होता. काही शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत राहिले. या बाबत गावागावातून तक्रारी येत होत्या. हा प्रश्न सोडवण्यासाठी
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने रिक्त पदांवर कंत्राटी शिक्षक भरण्याचा निर्णय घेतला होता. ही अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही जि. प. शिक्षण विभागाला दिल्यानंतर इच्छुकांकडून अर्ज स्वीकारणे, हरकती मागवणे या प्रक्रिया अंमलबजावणीला विलंब झाला होता. त्यात विधानसभेची आचारसंहिता लागल्याने ही प्रक्रिया रखडली होती. निवडणूक संपल्यानंतर लगेचच जिल्हा परिषदेने पहिल्या टप्प्यातील नियुक्त केलेल्या शिक्षकांची यादी जाहीर केली. यात १०पेक्षा कमी पट असलेल्या शाळांचा समावेश आहे. रिक्त पदांसाठी १ हजारहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील ज्या गावातील शाळेत पद रिक्त आहे, त्या परिसरातील उमेदवाराला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्यात १०६ जणांना नियुक्ती दिली आहे. उर्वरित पदांसाठी तालुक्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यासाठी ही नियुक्ती प्रक्रिया ८ दिवसांत पूर्ण केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. रिक्त पदे भरण्यासाठी डीएड, बीएडमधील गुणांनुसार मेरीट लिस्ट तयार केली आहे. त्यावर हरकती मागवल्या आहेत. उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यापूर्वी समूपदेशन प्रक्रिया तालुकास्तरावर राबवण्यात येणार आहे.