
जिल्ह्यात मागेल त्याला ठिबक योजना कार्यान्वित
रत्नागिरी : फलोत्पादन जिल्हा म्हणून रत्नागिरीची घोषणा झाल्यानंतर फळबाग लागवडीला चालना मिळाली. डोंगरावर, कातळावर फळबाग लागवड वाढू लागली. पावसाळ्यानंतरच्या प्रखर उन्हात कलमे जगविण्यासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करणे शक्य नसल्याने ठिबक सिंचनाकडील शेतकर्यांचा कल वाढत आहे. पावसाळी शेतीवर अवलंबून न राहता बागायतीमधील आंतरपिकाकडे शेतकर्यांचा कल वाढू लागला आहे. शिवाय विविध पिके घेणार्या प्रयोगशील शेतकर्यांची संख्या वाढत आहे. शेतीसाठी ठिबकचा वापर बहुतांश शेतकर्यांनी करावा, यासाठी शासनातर्फे ‘मागेल त्याला ठिबक’ योजना राबविण्यात येत आहे.
डोंगर उतारावरील जागेची निगा राखण्यासाठी भरपूर खर्च असल्याने शेतकर्यांनी बँकेचे अर्थसहाय्य घेऊन शासनाच्या विविध अनुदानाचा वापर करीत कलमबागा विकसित केल्या आहेत. रस्त्यालगत, पाणवठ्यालगतच्या लागवडीत समस्या उद्भवली नाही. मात्र, कातळावरील लागवडीचा प्रश्न होता. पाण्याअभावी झाडे जगत नसल्यामुळे शासनाने शेतकर्यांसाठी विहीर असलेल्या फळबागांसाठी ठिबक, तुषार सिंचन पद्धत अनुदानावर उपलब्ध करून दिली आहे. शासनाने ’मागेल त्याला ठिबक सिंचन’ यावर भर दिला आहे. डोंगर उताराच्या जागेमुळे विहिरीचा प्रश्न, शिवाय भरपूर अंतरावर पाणी नेण्यासाठी पाईपचा खर्च वाढत असल्याने शेतकर्यांना एकाचवेळी खर्च करणे परवडत नाही. डोंगराळ भागात ठिबक सिंचन योजना फायदेशीर असली तरी डोंगराळ भागामुळे खर्चिक आहे. सर्वसाधारण गटासाठी 35 टक्के तर अनुसूचित जाती, जमाती व महिला शेतकर्यांसाठी 45 टक्के अनुदान शासनाकडून दिले
योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 2023- 24 मध्ये लाभार्थी शेतकर्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली होती. तरीही ठिबकसाठी शेतकर्यांचा प्रतिसाद वाढत आहे. गतवर्षीच्या 279 शेतकर्यांपैकी 83 शेतकर्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली होती. त्यातील 76 शेतकर्यांनी बिले अपलोड केल्याने 57 शेतकर्यांच्या खात्यात 10 लाख 98 हजार 674 रूपये जमा झाले आहेत. उर्वरित 19 शेतकर्यांची रक्कम लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होणार
आहे.