
निवडणुकीमुळे मिनीमंत्रालयात शुकशुकाट
ताणामुळे अनेकांची दांडी ; जिल्हा परिषद सोमवारपासून गजबजणार
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीची धामधुम बुधवारी संपली. निवडणुकीच्या कामात शासकीय अधिकारी, कर्मचारी गुंतले होते. काल रात्री उशिरा हे अधिकारी, कर्मचारी मतपेट्या घेऊन आले. त्यामुळे आज कर्मचाऱ्यांविना जिल्हा परिषदेत शुकशुकाट होता. जिल्हा परिषद भवनात सन्नाटाच पाहायला मिळाला. बहुसंख्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक कामाच्या ताणामुळे दांडी मारल्याचे दिसून आले.
विधानसभा निवडणुकीची अचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणुकीच्या कामात अधिकारी व कर्मचारी व्यस्त झाले. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषद भवनात शुकशुकाट पसरला. यामुळे नागरिकांच्याही कामाचा खोळंबा होऊ लागला. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागल्यानंतर अनेक शासकीय कार्यालयांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची नेमणूक निवडणुकीच्या कामासाठी करण्यात आली. या कालावधीत सर्व शासकीय योजना व विकासकामे बंद असल्याने शासकीय कार्यालयांमधील नागरिक व ठेकेदारांची वर्दळ घटल्याचे चित्र जिल्हा परिषदेत होते. आचारसंहितेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. मात्र कार्यालयीन कामकाजातून जरासा विरंगुळ मिळतो न मिळतो तोवर निवडणूक कामासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना ऑर्डर काढल्या. त्यामुळे या निवडणूक कामासाठी हे कर्मचारी हजर झाले होते. जिल्ह्यात बुधवारी मतदान झाले. बहुसंख्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना या कामासाठी नियुक्त करण्यात आले होते. मतदान झाल्यानंतर मतपेटी पोचविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. काल कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हजर राहणे गरजेचे होते. परंतु या ताणामुळे अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी दांडी मारली. यामुळे जिल्हा परिषद भवनात काल आज काहीसा शुकशुकाटच पाहायला मिळाला.