
दोन दिवसांत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान
रत्नागिरी: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सोमवारी (ता. १८) संपणार आहे. तेव्हा आता प्रमुख कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधत घरोघरी प्रचारावर भर दिला आहे. प्रत्येक उंबऱ्यासाठी संपर्क यंत्रणा कार्यरत झाली आहे. उमेदवारांना प्रत्यक्ष सर्वच मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने विविध परिसरनिहाय प्रचारफेरी, कोपरा सभांवर भर दिला आहे. प्रचारासाठी शेवटचे दोनच दिवस उरल्यामुळे आता अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आहे.
शहरात सकाळच्या सत्रात प्रभागनिहाय ‘चाय पे चर्चा’ रंगली आहे आणि रात्री जेवणावळींचा बेत ठरलेला आहे. अर्थातच, त्यासाठी त्या-त्या परिसरातील कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाचे मुहूर्त काढण्यात आले आहेत. शहर परिसरातील हॉटेल्स सायंकाळनंतर हाउसफुल्ल असून, येथे कूपन्सची यंत्रणा कार्यरत आहे. प्रमुख कार्यकर्त्यांना सर्व प्रकारची ‘रसद’ पुरवण्यात आली असून, ते पूर्णवेळ प्रचारात आहेत. सकाळी सहापासूनच त्यांच्या संपर्क मोहिमेला प्रारंभ होतो आणि मध्यरात्री एक-दोनपर्यंत आवश्यक त्या सर्व ‘जोडण्या’ लावण्यासाठी ते सक्रिय आहेत. ज्या-ज्या भागात प्रचारफेरी, कोपरा सभा आहेत, त्या ठिकाणी मंडप आणि स्टेजची व्यवस्था लावण्यासाठी स्वतंत्र टीम कार्यरत आहे. सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठीही तरुणाईची स्वतंत्र फौज असून, कोणते मेसेजेस, व्हिडिओ व्हायरल करायचे, याचे नियोजन ही मंडळी करत आहेत. बाहेरील मतदार आणण्यासाठी प्रभागनिहाय याद्या तयार झाल्या असून, त्यासाठी स्वतंत्र टीम कामाला लागली आहे. हे मतदार आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व ‘सुविधा’ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.