
राजापूरात किरण सामंतांसमोर राजन साळवींचे कडवे आव्हान
राजापूर: लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी माघार घ्यावी लागल्याने उद्याोगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे पाचव्यांदा नशीब अजमावीत आहेत. शिवसेनेचे (ठाकरे) आमदार राजन साळवी यांच्याशी त्यांची लढत असली तरी भावाच्या विजयासाठी उदय सामंत यांची सारी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मिळालेल्या २० हजारांच्या मताधिक्यामुळे किरण सामंत यांच्यासाठी ही लढत सोपी नाही हेच स्पष्ट होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र या वेळी प्रथमच मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळत आहे. राजापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या विरोधात किरण सामंत यांनी आव्हान उभे केले आहे. पण काँग्रेसमधील बंडखोरीमुळे शिवसेनेचे राजन साळवी यांचे नुकसानच होणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आमदार राजन साळवी तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत, तर शिवसेना शिंदे गटाकडून पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसच्या अविनाश लाड यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे हे विजयी झाले तरी उदय सामंत यांच्या रत्नागिरी तसेच राजापूरमधून शिवसेना ठाकरे गटाला आघाडी मिळाली होती. हा सामंत बंधूंसाठी धोक्याचा इशारा आहे. स्वत:चा रत्नागिरी मतदारसंघ राखण्याबरोबरच राजापूरमध्ये भावाच्या विजयासाठी उदय सामंत यांना सारी ताकद पणाला लावावी लागणार आहे.
राजन साळवी यांनी २०१४ पासून या मतदारसंघावर आजतागायत एक हाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मात्र नाराज झालेल्या काँग्रेसचे अविनाश लाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून बंडखोरी केली आहे.