
राजापूर- लांजा मतदारसंघात तिरंगी लढत
रत्नागिरी: जिल्ह्यातील रत्नागिरी-संगमेश्वर, लांजा-राजापूर आणि गुहागर मतदारसंघांत बंडखोरी झाली होती. मविआसह महायुतीच्या उमेदवारांना धोक्याची घंटा होती. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रत्नागिरी आणि गुहागरमधील बंडखोरांनी आपली तलवार म्यान केली. राजापूरमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी कायम राहिल्याने अडचणी वाढल्या आहेत.
जिल्ह्यात दापोली-खेड, गुहागर, चिपळूण-संगमेश्वर, रत्नागिरी- संगमेश्वर आणि लांजा-राजापूर असे पाच मतदारसंघ येतात. यात, महाविकास आघाडीमध्ये रत्नागिरी आणि लांजा-राजापूरमध्ये बंडखोरी झाली होती. रत्नागिरीत उबाठामध्ये भाजपमधून आलेले माजी आमदार बाळ माने यांना उमेदवारी दिली गेल्याने, गेली 45 वर्षे शिवसेनेत निष्ठावंत म्हणून काम करणार्या माजी जि. प. उपाध्यक्ष उदय बने यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु सोमवारी त्यांनी अर्ज मागे घेतला असला तरी त्यांची नाराजी दूर झालेली नाही. रत्नागिरीप्रमाणेच राजापूरमध्येही महाविकास आघाडीला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. याठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे महायुतीचे उमेदवार आहेत. राजापूर व रत्नागिरीप्रमाणेच गुहागर मतदारसंघातही महायुतीमध्ये बंडखोरी झाली होती. याठिकाणी महायुतीकडून शिवसेनेचे राजेश बेंडल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपकडून ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महायुतीचाच मित्रपक्ष रिपाइंच्या संदेश मोहीते यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु या दोघांचीही समजूत घालण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले आहे. गुहागरचे चार टर्म आमदार असणारे भास्कर जाधव यांच्यासमोर आता बेंडल यांचे तगडे आव्हान असणार आहे. दापोलीमध्ये महायुतीचे उमेदवार आमदार योगेश कदम यांच्याविरुद्ध मविआचे माजी आमदार संजय कदम यांच्यात जोरदार लढत आहे. त्यातच या दोन्ही उमेदवारांशी नाम साधर्म्य असणारे आणखी दोन-दोन उमेदवार रिंगणात असल्याने त्याचा फटका नेमका महायुती की मविआला बसतो हे येणार्या निकालावरून स्पष्ट होणार आहे. चिपळूणमध्येही महायुतीचे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम विरोधात शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत यादव यांच्यातच काँटे की टक्कर होणार आहे.