
`सृष्टी’च्या मृत्यूला जबाबदार कोण?
विंचूदंशावर उपचार तोकडे ; बालिकेच्या मृत्यूनंतर प्रश्न
रत्नागिरी: तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथील शाळकरी मुलीचा ऐन दिवाळीच्या सुटीत विंचूदंशाने मृत्यू होणे हे आपल्या आरोग्ययंत्रणेचे की डॉक्टरांचे अपयश असा प्रश्न रत्नागिरी तालुक्यातून गांभीर्याने पुढे आला आहे.
सृष्टी महेश पानवलकर हिला विंचूदंश झाल्याने तिला २९ ऑक्टोबरला प्राथमिक आरोग्यकेंद्र जाकादेवी येथे दाखल करण्यात आले. तेथून तिला रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पालकांनी आपल्या मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे पाहून रत्नागिरी येथील एका खासगी दवाखान्यातही उपचारासाठी नेले. सृष्टी हिला चांगले उपचार व्हावेत, प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी एवढी धडपड करूनही प्राथमिक आरोग्ययंत्रणा, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि खासगी आरोग्ययंत्रणेकडून सक्षम उपचार का मिळू शकला नाही! हे आपल्या आरोग्ययंत्रणेचे, डॉक्टरांचे यश की अपयश? १२ वर्षीय मुलीला मानसिक आधार देण्यात किंवा समुपदेशन करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नाही का? असा प्रश्न तालुक्यातून अतिशय गांभीर्याने पुढे आला आहे.
सृष्टी ही अतिशय हुशार आणि जिज्ञासू विद्यार्थिनी होती. जाकादेवी विद्यालयातील सातवी अ सेमी इंग्रजी वर्गातील एक अभ्यासू विद्यार्थिनी म्हणून परिचित होती.
जाकादेवी प्राथमिक आरोग्यकेंद्रातर्फे म्हणावी तशी आरोग्यसेवा सर्वसामान्य जनतेला मिळत नाही, असा काही रुग्णांचा अनेक दिवसांपासून आरोप होता. आरोग्यकेंद्राविषयी ओरड होती. कधी कधी जाकादेवी आरोग्यकेंद्रात वैद्यकीय अधिकारी नसतात. मीटिंगला गेले आहेत, रत्नागिरीत गेले आहेत, थांबा नंतर येतील, असे कर्मचारी रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सांगतात. हे कधी थांबेल? माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एवढी मोठी झेप घेतली असताना सर्पदंश, विंचूदंशावर औषधे उपलब्ध किती प्रमाणात आहेत? ती परिणामकारक आहेत का? संवेदनशील मनाचे अधिकारी व पदाधिकारी विभागात कार्यरत आहेत का? असे प्रश्न सृष्टीच्या मृत्यूने निर्माण झाले आहेत.