
रत्नागिरीत कॉंग्रेसचे बंडाचे निशाण; राज्यात आघाडी जिल्ह्यात बिघाडी
रत्नागिरी:- राज्यात महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असतानाच त्याचे पडसाद आता कोकणात उमटू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कॉंग्रेसने बंडाचे निशाण फडकवले असून ४ विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस आपले उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी दिली आहे. निर्णय कोणताही होवो आम्ही निवडणूक लढवणार म्हणजे लढवणारच असा इशारा लाड यांनी दिला आहे.
राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि कॉंग्रेस पक्षात जागा वाटपावरून तू-तू मै-मै सुरू आहे. त्याचे पडसाद आता कोकणात उमटू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कॉंग्रेसने मंगळवारी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी सांगितले की, जिल्ह्यात कॉंग्रेसचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. आता आम्हाला आमचे अस्तित्व टिकवायचे आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये उद्रेक निर्माण झाला आहे.
सध्या राजापूर विधानसभा मतदारसंघात जे काही चित्र निर्माण झाले आहे ते सार्यांना माहित आहे. रोज नवनवीन पक्षप्रवेश होत आहेत. उबाठाचे कडवट शिवसैनिक पक्षाला जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. या मतदारसंघात उबाठाची ताकद संपली आहे.
निष्ठावंत, निष्ठावंत म्हणून ओरड मारायची, मात्र विकासाच्या नावाने बोंबाबोंब आहे. १५ वर्षे आम्ही स्थानिक जनतेने सर्व काही सहन केले. आता आम्हाला उपरे उमेदवार नको, आम्हाला आता स्थानिक उमेदवार हवाय आणि या विधानसभा मतदारसंघातील जनतेने ठरवलेय की स्थानिकच उमेदवार निवडून द्यायचा आहे. जर उबाठाला उमेदवारी मिळाली तर या मतदारसंघात आघाडीचा पराभव निश्चितच होईल. निष्ठावंताची गरज रत्नागिरीला आहे. रत्नागिरीचे पार्सल रत्नागिरीला परत पाठवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आम्ही कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कॉंग्रेस पक्ष म्हणून आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करू. वरिष्ठांनी त्याची दखल घ्यावी. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही वेळ पडल्यास अपक्ष लढू असा इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी बोलताना अविनाश लाड म्हणाले की, मी स्वतः राजापूर विधानसभा मतदारसंघातून २४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्याचबरोबर चिपळूणमधून सुनिल सावर्डेकर, दापोलीमधून अनंत जाधव, रत्नागिरीमधून परशुराम खेत्री तर गुहागरमधून सहदेव बेटकर यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात कॉंग्रेसने बंडाचे निशाण फडकवल्याने महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून नेहमीच आम्हाला डावलणार्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचे कॉंग्रेस पदाधिकार्यांनी सांगितले.
या बैठकीला कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, महिला जिल्हाध्यक्षा ऍड. अश्विनी आगाशे, राज्याच्या सरचिटणीस रुपाली सावंत, अशोकराव जाधव, दीपक राऊत, अनिरुद्ध कांबळे, खलील सुर्वे, धनिता चव्हाण, अनिता शिंदे, सलवा नावडे, रविंद्र खेडेकर आदी उपस्थित होते.