
पुढील दोन दिवस किनारपट्टी भागात अवकाळी पाऊस
रत्नागिरी: परतीच्या पावसाचा जोर ओसरलेला असला तरी अरबी समुद्रासह बंगालच्या उपसगरातील कमी दाबाची प्रणाली प्रभावी ठरत असल्याने पुढील दोन दिवस किनारपट्टी भागात अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार आहे.
त्यामुळे रत्नागिरीसह कोकणातील सर्व जिल्ह्यांत जोरदार विजांसह पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. बुधवारी संध्याकाळी पावसाने तडाखा दिल्यावर कोजागरीच्या रात्रीही पावसात सातत्य होते. गुरुवारची सकाळही मळभाच्या सावटात होती.
दरम्यान, बुधवारी झालेल्या पावसाने अनेक भागांत भात पीक आडवे झाले असल्याने जिल्ह्यातील पीक स्थितीचा दोन दिवस विजांसह पावसाचा इशारा तातडीने आढावा घेण्याच्या सूचना कृषी विभागाने केल्या आहेत. बुधवारी जोरदार झालेल्या पावसाने काही भागात हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा नियंत्रण कक्षाने व्यक्त केला आहे. गुरुवारी संपलेल्या २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात २२ मि.मी.च्या सरासरीने २०१ मि.मी. एकूण पाऊस झाला. सर्वच तालुक्यात २५ ते ३० मि.मी. पावसाची नोंद झाली.