
रत्नागिरी वन्यजीव सप्ताह : छंदाकडून संवर्धनाकडे…
५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील समृद्ध अधिवास आणि प्रजातींबद्दल दिली माहिती
रत्नागिरी : वन्य जीव सप्ताहानिमित्त सह्याद्री संकल्प सोसायटी, निसर्ग सोबती, महाराष्ट्र वन विभाग, रेनट्री फाऊंडेशन, लेन्स आर्ट रत्नागिरी, सृष्टीज्ञान आणि एएसपी कॉलेज यांच्यावतीने २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताह आयोजित केला होता. सप्ताहानिमित्त राबवल्या गेलेल्या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन देवरुख येथील एएसपी कॉलेज येथे उद्घाटन झाले.
दरवर्षी भारतात २ ते ८ ऑक्टोबर हा राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. गेल्या वर्षी रत्नागिरी येथे जैवविविधता ही थीम घेऊन वन्यजीव सप्ताहाची सुरुवात झाली. या उपक्रमाची खासियत म्हणजे हा उपक्रम स्थानिक स्वयंसेवी संस्था, जिल्ह्यातील वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, वनाधिकारी, वन्यजीव प्रेमी आणि छायाचित्रकारांच्या सहभागाने या कार्यक्रमांचा उद्देश हा रत्नागिरी जिल्ह्यातील समृद्ध जैवविविधतेबद्दल जागरूकता निर्माण करणे. संवर्धन होणे हा होता.
सप्ताहानिमित्त राबवल्या गेलेल्या विविध कार्यक्रमांच्या उद्धाटनप्रसंगी देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, चिपळूण विभागाच्या एसीएफ प्रियांका लगड, देवरूख कॉलेजचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण आठवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात निसर्ग सोबती संस्थेच्या तज्ञांनी घेतलेली निसर्ग भ्रमंती सहल, एएसपी कॉलेज, देवरुख येथील वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन आणि विविध शाळा महाविद्यालयात जनजागृतीपर कार्यक्रम यांचा समावेश होता. प्रदर्शनात जवळजवळ ३५० हून अधिक छायाचित्रे मांडण्यात आली होती.
जिल्ह्यात आढळणाऱ्या विविध अधिवास आणि प्रजातींबद्दल माहिती मुलांना याप्रसंगी देण्यात आली. ही छायाचित्रे रत्नागिरीतील वन्यजीव छायाचित्रकार आणि लेन्सआर्ट रत्नागिरीच्या छायाचित्रकारांनी घेतली होती. तसेच यानिमित्ताने विविध शाळांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या दोन्ही उपक्रमांमधून ५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातील समृद्ध अधिवास आणि प्रजातींबद्दल माहिती देण्यात आली. नागरिक आणि विद्यार्थ्यांना वन्यजीव संवर्धन क्षेत्रात सहभागी करून घेणे, त्यांना वन्यजीवांच्या संरक्षणाचे महत्त्व समजावणे हे मुख्य उद्दिष्ट यानिमित्ताने साध्य होत असल्याचे दिसून येत आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी निसर्ग सोबतीचे निखिता शिंदे, विराज आठल्ये, सह्याद्री संकल्पचे प्रतीक मोरे, डॉ. शार्दूल केळकर, कुणाल आणेराव, तन्मय मांजरेकर, डॉ. प्रताप नाईकवडे, सृष्टीज्ञान संस्थेच्या केतकी फाटक या सर्वांनी अथक परिश्रम घेतले.
एएसपी कॉलेज देवरुख येथे भरवलेल्या प्रदर्शनाचा सात शाळांमधील चार हजारांहून विद्यार्थी आणि नागरिकांनी लाभ घेतला. या वेळी मान्यवर पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक यांनी भेट दिली. रत्नागिर मध्ये फाटक हायस्कूल, शिर्के प्रशाला, पटवर्धन हायस्कूल, सर्वांकश विद्या मंदिर, येथील दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या कामी बाबासाहेब परुळेकर, मनोज पाटणकर, सिद्धेश वैद्य, नंदिनी देसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले.