
नवरात्रोत्सवात भाजांची मागणी वाढल्याने दर कडाडले
रत्नागिरी : शारदीय नवरात्र उत्सवात घरोघरी होणार्या उद्यापने आणि व्रतवैकल्यामुळे शाकाहार घेणे अधिक पसंती असते. त्यामुळे भाज्यांना वाढती मागणी असल्यामुळे पुन्हा भाज्या दरात वधारल्या आहेत. बहुतांश भाज्यांनी शंभरी ओलांडली असून, टोमॅटो व कांद्याची साठी, तर बटाट्यानींही पन्नाशी पार केली आहे.
दरवाढीमुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. जिल्ह्यात गुरुवारपासून नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला आहे. या दिवसात सात्विक शाकाहार घेतला जातो. यामुळे या दिवसात भाज्यांना मागणी वाढते. मात्र, पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने जिल्ह्यात भाजीपाला आवक मंदावली आहे. त्यातच सणवार असल्यामुळे भाज्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे दरवाढ झाली असल्याचे सांगण्यात येते.
टोमॅटो, हिरवी मिरची, कोबी, वांगी, फ्लॉवर, पावटा, गाजर, घेवडा, फरसबी, गवार, सिमला मिरचीसह मुळा, माठ, पालक, शेपू, मेथी या पालेभाज्यांचीही वाढ झाली आहे. बाजारात नवीन बटाट्याची आवक होत असून, 40 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. लसणाचे दर अद्याप तेजीतच आहेत.
लसूण बरोबरच कांद्यानेही दरात पुन्हा उसळी घेतली असून, 240 ते 320 रुपये किलो दराने लसणाची विक्री सुरू आहे. कांदा पन्नाशी गाठण्याच्या तयारीत आहे. काही भागात ओला कांदा 35 ते 40 रुपये दरांने विकला जात आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने गृहिणीचा सुका साठवणुकीचा कांदा घेण्याकडे कल आहे. मात्र काद्यांचे दर वाढले असल्याने तुर्तास किरकोळ खरेदी करुन समाधान मानावे लागत आहे.