
परतीच्या पावसामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाला तडाखा
रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सध्या वेगात सुरू असून येत्या काही दिवसातच त्याचे उद्घाटन होणार आहे; मात्र त्याआधीच परतीच्या पावसाने रेल्वे स्थानक सुशोभीकरणाच्या कामाला दणका दिला आहे. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे छताला लावलेल्या पीओपीच्या शीट फाटल्या आहेत. सुदैवाने यात कोणालाही इजा झालेली नाही; मात्र आता कोट्यावधी रुपये खर्च करून केल्या जाणाऱ्या सुशोभीकरण कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
गेले काही दिवस वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. एकीकडे मॉन्सून आपल्या परतीच्या प्रवासाला सज्ज झाला असून, दुसरीकडे मात्र उष्माने म्हणजेच ऑक्टोबर हीटने नागरिक त्रस्त झाले आहेत. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज अचानक सायंकाळी परतीच्या पावसाने दाणादाण उडवली. विजांच्या कडकडाट, ढगांच्या गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेकांची भांबेरी उडवली. या पावसाचा फटका रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाला बसला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रेल्वेस्थानकावर छताला केलेले पीओपी खाली कोसळले. त्याच्या वरचा पडदा लोंबकळलेल्या अस्वथेत होता.
या ठिकाणी प्रवासी उभे नसल्याने कोणाला ही काहीही झाले नाही; मात्र आता कोट्यावधी रुपये खर्च करून केल्या जाणाऱ्या सुशोभीकरण कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.