
एसटी अस्वच्छ आढळल्यास आगार व्यवस्थापकांना दंड
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाकडून एसटी बसमध्ये स्वच्छतेच्यादृष्टीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. अस्वच्छ एसटी बस आढळल्यास त्याचा ठपका थेट आगार व्यवस्थापकांवर ठेवत दंडात्मक कारवाईचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
स्वच्छ एसटी स्थानक मोहिमेनंतर आता एसटी बसेस स्वच्छतेसाठी नवीन मोहीम सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. बसच्या स्वच्छतेबाबत महामंडळाने गांभीर्याने ही मोहीम राबवण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा महामंडळाने दिला आहे. महात्मा गांधी जयंतीच्या एक दिवस आधी पासून एसटी बसेसची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. बसमधील अस्वच्छतेवर महामंडळाने लक्ष केंद्रीत केल्याने बसेसची स्वच्छता प्राधान्याने केली जात आहे. आगार व्यवस्थापकांवर गाड्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी निश्चित करून दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. महामंडळाकडून सर्व विभागांना स्वच्छतेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. बसेस तपासणीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात आले आहे. या पथकाकडून महिन्यातून १५ बसेसची तपासणी होणार आहे. गुण देण्याची जबाबदारी पथकाला आहे. त्यामध्ये कमी गुण असणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
वारंवार सूचना देऊनही बसेस स्वच्छतेबाबत स्थानिक प्रशासनाकडून कार्यवाही केली जात नाही. यामुळेच दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र रत्नागिरी विभागातील एसटी बसेस स्वच्छ ठेवल्या जात असल्याचे सांगितले जात आहे.