
रा. भा. शिर्के प्रशालेच्या स्काऊट – गाईड, एनसीसी विभागा कडून मांडवी समुद्र किनाऱ्याची स्वच्छता
नगर परिषदेच्या सहकार्याने सुमारे दिड ते दोन टन कचरा गोळा केला
रत्नागिरी : महात्मा गांधी जयंती निमित्त रा.भा.शिर्के प्रशाला ॲरोमरीन स्काऊट – गाईडसह एनसीसी विभागाकडून मांडवी समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला. रत्नागिरी नगरपरिषद व रा.भा. शिर्के प्रशाला रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले व उपक्रमासाठी सदिच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी समुद्रकिनाऱ्यांचे महत्त्व विशद केले त्याचप्रमाणे समुद्रकिनारे स्वच्छ का असावेत याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक संदेश कांबळे यांनी विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन समाजात जाणीव जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले.
कोकणासाठी समुद्रकिनारे हे अत्यंत महत्त्वाचे असून त्यावर कोकणाची निम्म्याहून अधिक उपजीविका अवलंबून असल्याचे तसेच महसुलामध्ये मोठा वाटा हा मच्छीमारीचा असल्याने याबरोबरच पर्यटनाच्या दृष्टीने समुद्रकिनारे स्वच्छ असणे आवश्यक असल्याचे मत रा.भा.शिर्के प्रशालेचे ॲरोमरीन स्काऊट- गाईड विभाग प्रमुख प्रशांत जाधव यांनी सांगितले . समुद्र किनाऱ्यांवर आपण फिरण्यास व मोकळा हवेतील श्वास घेण्यास जात असतो अशावेळी समुदाच्या पाण्याच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे नदी , ओढे पऱ्यांमध्ये प्रदुषणकारी वस्तू टाकाव्यात की नाही ? याचा विचार पर्यटकांसह जिल्हावासीयांनी केला पाहिजे. असेही त्यांनी नमूद केले.
सदर कार्यक्रमाच्या वेळी शहरातील विविध शाळा कॉलेजेस यांसह रा.भा.शिर्के प्रशालेचे स्काऊट व इंग्रजी विभाग प्रमुख प्रशांत जाधव एनसीसी युनिट प्रमुख रणजीत गद्रे तसेच एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते.
सदर उपक्रमाप्रसंगी गुणवंत व कार्यप्रवण स्वच्छता कामगारांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला . यावेळी सुमारे दोन टन कचरा गोळा करण्यात आल्याचे न.प. सुत्रांनी सांगितले.