
‘कातळशिल्पां’मुळे रत्नागिरीत वाढणार परदेशी पर्यटकांची संख्या
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला लागून असलेली तीन जागतिक वारसास्थळे आणि प्रस्तावित यादी दाखल झालेली सात कातळशिल्पे व सुवर्णदुर्ग किल्ला यामुळे पुढील काही वर्षांतच रत्नागिरीत परदेशी पर्यटकांची संख्या वाढणार आहे. कोकण रेल्वे, पूर्ण होणारा मुंबई-गोवा महामार्ग आणि प्रवासी विमान वाहतूक सेवा हे त्याला पोषक ठरतील. अल्पावधीतच अडीच लाखांहून अधिक पर्यटकांनी कातळशिल्पांना भेट दिली आहे. या पर्यटकांना पूरक व्यवसायांद्वारे सेवा देण्याकरिता एकत्र येण्याची आवश्यकता आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर लागूनच असलेल्या जिल्ह्यात तीन म्हणजे सह्याद्रीतील कोयना अभयारण्य, चांदोली अभयारण्य आणि राधानगरी अभयारण्य ही जागतिक वारसास्थळे आहेत. आता नव्याने प्रस्तावित यादीत सात कातळशिल्पांचा समावेश झाला आहे. यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल; परंतु त्यांना सेवा देण्यासाठी पूरक व्यवसाय एकत्रित प्रयत्नांतून उभे राहतील. जिल्ह्यात ८ व नजीकच्या जिल्ह्यात ३ अशी ११ वारसास्थळे असणारे रत्नागिरी हे भारतातील महत्वाचे ठिकाण होईल.
गेल्या दहा ते बारा वर्षांत कातळशिल्पांचा शोध, संशोधनामुळे रत्नागिरी जिल्हा जगाच्या नकाशावर पोहोचला आहेच. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंधांद्वारे कातळशिल्पांची गूढ माहिती जागतिक पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे या उत्कंठेपायी अनेक पर्यटक नक्की भेट देत आहेत. पर्यटक निवास, जेवण, चहा-पाणी, गाईड तसेच वाहतूक, कोकणची ओळख दाखवणाऱ्या वस्तूंची विक्री असे विविध पूरक व्यवसाय करता येतील. त्याकरिता रत्नागिरीकरांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
—
प्रस्तावित कातळशिल्पे
रत्नागिरी जिल्हा- रत्नागिरी तालुका-उक्षी, जांभरूण (ठिकाणे २), राजापूर तालुका-कशेळी, रूंढे, देवीहसोळ, बारसू आणि देवाचे गोठणे (५).
सांस्कृतिक कार्य मंत्रालय, महाराष्ट्र शासनातर्फे कातळखोद चित्र ठिकाणे परिसर संरक्षित करण्यासाठी प्रस्तावित केलेली पहिल्या टप्प्यातील ठिकाणे- भगवतीनगर, चवे, देऊड, उक्षी, उक्षी (२), निवळी गावडेवाडी, कापडगाव, उमरे, कोळंबे, कशेळी, रूंढे, देवीहसोळ, बारसू, गोवळ, देवाचेगोठणे, सोलगाव.