
अतिवृष्टीत बुडालेले दिवस शाळास्तरावर भरून घेणार
रत्नागिरी : पावसाळी हंगामात अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे कामाचे किमान दिवस होणे आवश्यक आहे. सुट्टीचे दिवस रविवारी किंवा अन्य दिवशी भरुन घेण्यात येतील. शाळा स्तरावर हा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेचे प्राथमिकं शिक्षणाधिकारी कासार यांनी दिली.
ते म्हणाले, पावसाळी हंगामात अतिवृष्टीमुळे सुट्ट्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे शाळांचे कामकाज होऊ शकले नव्हते. सुट्टीचे दिवस भरुन काढणे गरजेचे आहे. शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे कामाचे किमान दिवस झाले पाहिजेत. शाळास्तरावर रविवारी किंवा अन्य दिवशी या सुट्ट्या भरुन काढण्यात येतील. शिक्षण हक्क अधिनियमाप्रमाणे पहिली ते आठवीसाठी कामाचे किमान तास होण्याबद्दल तरतूद झाली आहे. पहिली ते पाचवी दरम्यानच्या वर्गांसाठी वार्षिक २०० दिवस आणि किमान ८०० तास आणि सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी २२० दिवस आणि १,००० तास एवढे अध्ययन व अध्यापनासाठी दिले गेले पाहिजेत, अशी तरतूद आहे. यावर्षी बुडालेले दिवस भरून काढण्याचा अधिकार शाळास्तरावर देण्यात आल्याने शाळा व्यवस्थापन समितींना हा मुद्दा सोयीचा झाला आहे.