
ई-पीक पाहणीसाठी 23 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
रत्नागिरी: शासनाकडून राबविण्यात येणार्या ई-पीक पाहणी नोंदणीला शेतकर्यांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने शासनाकडून ई-पीक पाहणीसाठी 23 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पीक पाहणी नोंदणीत काही ठिकाणी तांत्रिक समस्या तर काही ठिकाणी जनजागृतीचा अभाव असल्याचे निदर्शनास येत आहे. पीक विमा योजनेत अंतिम पीक सातबार्यावरील नोंदीचे ठरणारे असल्याने ई-पीक पाहणी करणे गरजेचे आहे. नेटवर्क समस्या, अॅपमधील तांत्रिक बिघाडामुळे शेतकर्यांची डोकेदुखी वाढली आहे.
शेतकर्यांनी ई-पीक पाहणी अॅपच्या माध्यमातून ई-पीक पाहणी करून घ्यावी. प्रत्येक खातेदाराने आपला पीक पेरा यात नोंदविणे आवश्यक आहे. या नोंदी पीक विमा, पीक कर्ज वाटप, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मदत करणे आदी बाबींसाठी आवश्यक असणार आहेत. वापरकर्त्याला ई- पीक पाहणी मोबाईल वापरताना काही अडचण आल्यास अॅपमधील मदत बटनवर क्लिक करून त्यामध्ये असलेले व्हिडीओ पाहून अडचणी सोडवू शकतील किंवा महसूल, कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय शेंडे यांनी केले आहे.