
…तर रास्त धान्य दुकानदारांचा बंदचा इशारा अशोक कदम; पाच महिन्याचे मिळाले नाही कमिशन
रत्नागिरी : जिल्हा पुरवठा विभागाने फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२४ या पाच महिन्याचे कमिशन धान्य दुकानदारांना दिलेले नाही. त्यामुळे दुकानदार आर्थिक अडचणीत आले आहेत. कमिशन देण्यासाठी शासनाची चाललेली चालढकल योग्य नाही. त्यामुळे तातडीने कमिशन मिळाले नाही तर जिल्ह्यातील सर्व धान्य दुकानदार धान्य वितरण बंद ठेवतील व त्याची जबाबदारी शासनावर राहील, असा इशारा रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी दिला.
पाच महिन्याचे प्रतिक्विंटल १५० प्रमाणे मिळणारे कमिशन शासनाने दुकानदारांना दिलेले नाही. याबाबत जिल्हास्तरावर मागणी करूनही त्याची दखलही घेतली जात नाही. त्यामुळे दुकानदारांना सतत मोफत धान्य वितरण करून शासन सवंग लोकप्रियतेसाठी दुकानदारांची उपासमार करत आहे. ऐन गणेशोत्सवापर्यंत कमिशन मिळत नसल्याने दुकानदार नाराज आहेत. दुकानादारांना कुटुंब चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कमिशनशिवाय २०२२च्या नोव्हेंबर-डिसेंबरचे चलन कमिशन अजूनही जिल्हा पुरवठा खात्याकडून मिळालेले नाही. त्याचप्रमाणे उडीद डाळ, एपीएल धान्य संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजना, शालेय पोषण आहार यासारखी बिले शासनाने दिलेली नाहीत. दुकानदारांची चेष्टा शासनाने चालवलेली आहे. या सर्वांमुळे दुकानदारांना धान्य वितरण बंदची वेळ शासनाने आणू नये, असे जिल्हाध्यक्ष कदम यांनी सांगितले. ऐन गणेशोत्सवापर्यंत कमिशन मिळत नसल्याने दुकानदार नाराज आहेत. दुकानदारांना कुटुंब चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.