
रत्नागिरी परिसरातील एटीएममध्ये खडखडाट
रत्नागिरी: गणेशोत्सवात आलेले चाकरमानी आणि पर्यटकांमुळे एटीएममधून पैसे काढण्यासाठी झुंबड उडाली आहे. दुपारी रत्नागिरी शहरातील गाडीतळ परिसरातील एटीएममध्ये खडखडाट होता. पुरेसे पैसे नसल्यामुळे ग्राहकांना रोख पैसे काढता आले नाहीत, याबाबत काही ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.
गणपती उत्सवासाठी लाखो चाकरमानी जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. अनेक दुकानांमध्ये ऑनलाइन पेमेंट, गुगल पे वगैरे अॅपद्वारे पैसे दिले जातात; परंतु काही ठिकाणी रोख रक्कमेची गरज असते. शनिवार व रविवारी गणेशोत्सवानिमित्त बॅंकांना सुट्टी असल्याने चाकरमान्यांनी एटीएम सेंटर शोधण्यास सुरवात केली. गाडीतळ येथे पाच बॅंकांची एटीएम आहेत; परंतु या सर्वच ठिकाणी रोख रक्कम संपली होती. सोमवारी दुपारी गाडीतळ येथील गर्दी नसलेले एटीएम सेंटर पाहून काही मुंबईकर चाकरमानी आनंदाने पैसे काढण्यासाठी त्या सेंटरमध्ये गेले; परंतु पैसे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. अनेक ग्राहकांची निराशा होईल, हे लक्षात घेऊन या जागरूक चाकरमान्याने चक्क एटीएमचे शटर अर्धे बंद करून ठेवले. सण, उत्सवावेळी बॅंकांनी आपली एटीएम सेंटर्समध्ये पुरेशी रोख रक्कम भरण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.