
महाराणी येसूबाई यांच्या स्फूर्ती स्थळासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण
रत्नागिरी : छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांचे माहेर असलेल्या शृंगारपूर येथे भव्य स्फूर्ती स्थळ व्हावे या मागणीसाठी सातार्याचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के हे आक्रमक झाले असून त्यांनी शृंंगारपूरचे सरपंच विनोद पवार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण सुरु केले आहे.
स्वराज्यासाठी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली अठरापगड जातीच्या लोकांनी आपल्या जिवाचे रान केले त्यातील राजेशिर्के व इतरही अनेक घराण्यांशी खुद्द शिवरायांची सोयरीक होती. यापैकीच एक राजेशिर्के घराण्याने आपले तन-मन धन अर्पण केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पट्टराणी कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर स्वराज्य संकटात असताना अत्यंत धीरोदात्तपणे या संकटाचा सामना केला. छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराजांचे रक्षण केले. तब्बल 29 वर्षे त्या मुघल बादशाह औरंगजेबाच्या नजर कैदेत होत्या. बंदीवासातही त्यांनी शाहू महाराजांवर उत्तम संस्कार करून कर्तृत्ववान राजा घडवला. मात्र येसूबाईंचे हे कर्तृत्व इतिहासाच्या पानांमध्ये झाकोळल्यासारखे आहे.
या कर्तुत्ववान सम्राज्ञीचे समाधीस्थळ लोकस्मृतीतून नष्ट व्हावे ही दुर्दैवाची बाब आहे. राजधानी सातारा येथील इतिहास संशोधकांनी येसूबाईंचे समाधीस्थळ शोधून काढले आहे. त्याच्या संवर्धनासाठीचा पाठपुरावा आम्ही सातत्याने करत आहोत. येसूबाई यांचे माहेर असलेले शृंगारपूर हे गाव देखील अजूनही दुर्लक्षित आहेत. कधीकाळी या गावात त्यांच्या पितृकुल राजेशिर्के घराण्याचा फार मोठा वाडा येथे होता, सरंजाम होता. परंतु या घडीला त्याचे भग्नावशेष मिळणे ही दुर्मिळ झाले आहे. अशा या विस्मृतीत गेलेल्या शृंगारपूर या गावी त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे स्फूर्तीस्थळ उभे राहावे म्हणून इतिहास संवर्धनासाठी सत्याग्रह म्हणून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात सातार्याचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के व शृंगारपूरचे सरपंच विनोद भिकाजी पवार हे उपोषणाला बसले आहेत.
शृंगारपूरच्या वाड्यातच येसूबाईंचे बालपण सरले. याच ठिकाणी अनेक वेळा छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य होते आणि दुर्दैवाने याच भागातील एका वाड्यात त्यांना अटक झाली. एवढा मोठा ऐतिहासिक वारसा या पटलावरून दुर्लक्षित झाला आहे. या ठिकाणी येसूबाईंचे स्फूर्तीस्थळ होणे गरजेचे आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास दुर्लक्षिला जाता कामा नये. हे स्मारक उभे न राहिल्यास पुढच्या पिढीला या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या बलिदानाचा इतिहास कळणार नाही. यासाठीच आम्ही हा आमरण उपोषणाला असलो असल्याचे सुहास राजेशिर्के व सरपंच विनोद पवार यांनी
सांगितले.