
हातिवले टोलनाका फोडून साहित्याची चोरी
राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हातिवले टोलनाका येथील यशयोग इन्फास्ट्रक्चर कंपनीचे कार्यालय फोडून आतील संगणक व प्रिंटर चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणी कंपनीचे मॅनेजर जयदेव अणसुरकर यांनी राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशयोग इन्फास्ट्रक्चर कंपनीला हातिवले येथील टोलनाक्यावर टोलवसुलीचे कंत्राट मिळाले होते. यासाठी सुमारे वर्षभरापूर्वी कंपनीने टोलनाक्यावर लोखंडी कंटेनरमध्ये आपले कार्यालय सुरू केले होते. मात्र महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसताना शासनाकडून टोलवसुली सुरू करण्यात आल्याने स्थानिकांनी विरोध करत टोलवसुलीचे काम बंद पाडले होते. त्यामुळे हे कार्यालय बंद स्थितीत होते. कंपनीचे मालक यशवंत मांजरेकर यांचे चिरंजीव यशयोग हे अधूनमधून येथे येवून कार्यालयाची पाहणी करत होते. दरम्यान 28 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30च्या दरम्यान यशयोग हे कामानिमित्त ९ रत्नागिरी येथे जात असताना त्यांनी हातिवले टोलनाका येथील आपल्या कार्यालयाची पाहणी केली असता कंटेनरचा मुख्य दरवाजाला लावलेले कुलूप तुटलेले व दरवाजा अर्धवट उघड दिसला. त्यामुळे त्यांनी आत जावून पाहणी केली असता आतील साहित्य चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेत चोरट्यांनी कॉम्प्युटर, प्रिंटर, युपीएस, किबोर्ड, माऊस अशा सुमारे ३९ हजाराच्या वस्तू चोरुन नेल्या.