
समाजकल्याण वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण
पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
रत्नागिरी:- पालकमंत्री उदय सामंत यांनी आज अचानक डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनातील समाजकल्याणच्या वसतिगृहाला भेट दिली. तेथील विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या जेवणाचे हाल पालकमंत्र्यांच्या नजरेस पडल्यानंतर उदय सामंत यांचा पारा चढला. त्यांनी समाजकल्याणच्या वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. येथील विद्यार्थ्यांना असणारे निष्कृष्ट दर्जाचे जेवण पाहून पालकमंत्री उदय सामंत यांनी चांगलेच सुनावले.
रत्नागिरी समाजकल्याण वसतिगृहामध्ये ८५ विद्यार्थी राहतात. त्यांच्या जेवण, नाश्ता आदीचा ठेका एका कंपनीला दिला आहे. या कंपनीकडून निष्कृष्ट दर्जाचे जेवण या विद्यार्थ्यांना दिले जात आहे. शासनाच्या जीआरनुसार ज्या पद्धतीने मेनू ठरवून दिला आहे त्या मेनूप्रमाणे कोणतेही जेवण विद्यार्थ्यांना दिले जात नसल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या लक्षात आले. त्यांनी जेवणासंदर्भात आणि इतर समस्यांसंदर्भात वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी चर्चा केली. या वेळेस विद्यार्थ्यांना शासनाकडून दिले जाणारे भत्ते, युनिफॉर्म आणि इतर सोयीसुविधांचा अभाव असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. संबंधित अधिकारी विद्यार्थ्यांना आवश्यक बाबी पुरवत नसल्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. समाजकल्याणच्या वसतिगृहाचा लेखाजोखा घेतल्यानंतर सामंत यांनी येथील विद्यार्थ्यांची कमिटी तयार करून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. विद्यार्थी जेव्हा सांगतील जेवण चांगलं होतं त्या वेळेस संबंधित ठेकेदाराला बिल अदा करण्यात यावे, अशा सूचना समाजकल्याण अधिकारी संतोष चिकने यांना दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी समजून त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी पालकमंत्री म्हणून पुरवण्याचे आश्वासन पालकमंत्री सामंत यांनी विद्यार्थ्यांना दिले. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, रत्नागिरी एमआयडीसीचे आरओ वंदना खरमाळे, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अमोल ओठवणेकर आदी उपस्थित होते.