
36 तासानंतरही अनुस्कुरा घाट अद्याप बंदच
राजापूर:- राजापूर – कोल्हापूर मार्गावरील अनुस्कुरा घाटात शनिवारी 24 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कोसळलेली दरड 36 तास उलटून गेले तरी ती हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाला अपयश आले आहे.
या मार्गांवरील वाहतूक सुरु होण्यास अनेक अडथळे निर्माण होत आहेत. माती हटवताना ढीगाऱ्याखाली असलेल्या प्रत्येक दगडाचा आकार इतका मोठा आहे की ते फक्त ब्लास्ट करूनच हटवण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे. यासाठी ब्लास्ट मशीन मागविण्यात आली असून सर्व दगड ब्लास्ट करून, रस्त्यावरील मातीचे ढिगारे, दगडांचे तुकडे बाजूला सारून,रस्ता स्वच्छ व वाहतुकीस सुरळीत करण्यासाठी तिसऱ्या दिवशीची संध्याकाळ होऊ शकते अशी माहित सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. सदर मार्ग बंद असल्याने मुंबई हून कोकणात अनुस्कुरा मार्गाने येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.त्यामुळे प्रवाश्यांचे हाल झाले आहेत.
रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता दरड हटवण्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली असून कामाच्या तिसऱ्या दिवशी रस्त्यात सर्वात मोठा अडथळा येणारा लांबीने अंदाजे नऊ फूट, उंची सहा फूट व रुंदीने पाच फूट असलेल्या दगडाचे चार ते पाच वेळा ब्लास्ट करून त्याची व्हील्हेवाट लावताना तिसऱ्या दिवशीची संध्याकाळ होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.