
गैरहजर पुरातत्त्व अधिकाऱ्यांवर कारवाई
रत्नागिरी: लोकमान्य टिळक जन्मस्थळातील ग्रंथालयात संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तिथे संशोधन करण्यासाठी जगभरातून लोक येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. टिळक जन्मस्थान हे पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे. एवढे सुंदर काम झाले आहे, त्याचे जतन आणि संरक्षणाची जबाबदारी पुरातत्त्व विभागाची आहे; परंतु आज या विभागाचे अधिकारीच अनुपस्थित आहेत. हे गंभीर असून अशा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी लागेल, असा इशारा सामंत यांनी दिला.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकमान्य टिळक जन्मस्थान नूतनीकरण कामाचे कोनशिला अनावरण करून आणि फीत कापून लोकार्पण करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, भैरी देवस्थानचे उपाध्यक्ष राजन जोशी, माजी नगरसेवक बिपिन बंदरकर, माजी नगरसेवक सुदेश मयेकर, मुन्ना चवंडे, सचिन करमरकर, माजी नगरसेविका करमरकर आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, रत्नागिरीच्या इतिहासात नोंद घेतली जाईल, असा आजचा दिवस आहे. आमदार असताना लोकमान्य टिळकांच्या मेघडंबरीसाठी आमदार फंडातून निधी दिला होता. अत्यंत सुंदर काम झाले आहे. हे स्मारक ऐतिहासिक वारसा जपणारे आहे. स्मारकाची, ग्रंथालयाची उत्तम वास्तू पाहा. अभ्यासक, पर्यटक यांच्यासाठी हे स्मारक उशिरापर्यंत उघडे ठेवले जाईल. या ठिकाणी वाकींग ट्रॅक सुविधाही केली जाईल.
शहरातील रस्त्यांचे खड्डे भरायला सुरवात झाली आहे. सुज्ञ लोकांनी वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी. दोन महिन्यात रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होणार आहे. आर्ट गॅलरी, थिबा पॅलेस थ्रिडी मल्टीमीडिया शो, प्राणीसंग्रहालय, तारांगण त्याचबरोबर शेतकऱ्यांची मुले इस्रो आणि नासासारख्या संस्थांना भेट द्यायला दरवर्षी जातात. हा विकासही पाहणे आवश्यक आहे. देशाला भूषण वाटणारा डिफेन्सचा प्रकल्प रत्नागिरीत येत आहे. त्याची घोषणा आठ दिवसात होईल, असेही पालकमंत्री म्हणाले.