
आम्ही रत्नागिरीकर आयोजित सभा शिंदे गटाने उधळली
रत्नागिरी:- आम्ही रत्नागिरीकर म्हणून रत्नागिरीकरांनी आयोजित केलेल्या बैठकीचा ताबा घेत शिवसैनिक व पालकमंत्री उदय सामंत यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने जाऊन पालकमंत्र्यांनी शहरासाठी किती कोटीची विकास कामे केली हे दाखवत, यापुढे पालकमंत्र्यांच्या विरोधात एकही शब्द एकूण घेतला जाणार नाही असा सज्जड इशाराही दिला. यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते. आयोजित सभाही त्यामुळे उधळली गेली. याप्रकाराने आम्ही रत्नागिरीकरचे पदाधिकारीही संतप्त झाले आहेत.
रत्नागिरी शहरात मोठ्याप्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने, सत्ताधार्यांसह विरोधकांनीही आंदोलने करुन लवकर खड्डे बुजवावीत असे प्रशासनास सुनावले होते. यानंतर आम्ही रत्नागिरीकरांच्या माध्यमातून शहरातील सद्यस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी एका हॉटेलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 5 वा. बैठक आयोजित करण्यात आली होती. या हॉटेलमध्ये माजी नगराध्यक्ष मिलींद कीर यांच्यासह विजय जैन व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
याचवेळी सत्ताधारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहूल पंडीत, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, ज्येष्ठ माजी नगरसेवक राजन शेट्ये, सुदेश मयेकर, महिला जिल्हाध्यक्षा शिल्पा सुर्वे, माजी नगरसेविका स्मितल पावसकर, विजय खेडेकर, बंटी कीर, सोहेल मुकादम यांच्यासह अनेक पदाधिकारी व युवा कार्यकर्ते यांनी बैठक होणार्या ठिकाणी जाऊन पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरात आणि तालुक्यात कोणत्या प्रकारची विकास कामे केली आहेत. याची माहिती दिली. त्याचप्रमाणे यापुढे फेसबूक, व्हॉटसअॅप, इन्स्टा यांच्यासह विविध समाजमाध्यमांवर पालकमंत्री सामंत यांच्या विरोधात कोणी काही बोलल्यास आणि वारंवार बदनामी केल्यास सहन केले जाणार नाही असा इशाराही देतानाच यापुढे जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही दिला. यावेळी पालकमंत्री सामंत यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी जोरदार घोषणाबाजी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. हा प्रकार सुरु असतानाच मिलींद कीर व विजय जैन हे दोघेही घटनास्थळावरुन निघून गेले. या बैठकीच्या माध्यमातून सामंत यांनी आपल्या पक्षाची ताकद दाखवल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेले रत्नागिरीतील अनेक मान्यवर हा प्रकार पाहून एका बाजूला उभे होते.