
शाळाबाह्य बालकांसाठी २० जुलैपर्यंत विशेष मोहिम
रत्नागिरी: शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करुन घेण्यासाठी जिल्हा परीषद शिक्षण विभागामार्फत सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी २० जुलै पर्यंतचा कालावधीत देण्यात आला आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार व अधिनियम २००९ राज्यात १ एप्रिल २०१० रोजी लागू करण्यात आले. या कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. कामानिमित्त मोठ्या प्रमाणावर कुटुंबाचे स्थलांतर होते. त्यांच्यासोबत असणार्या मुलांचे शिक्षणात खंड पडण्याची समस्या निर्माण होताना दिसत आहे. अशा शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करुन त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दिनांक ५ ते २० जुलै २०२४ या कालावधीत सर्वेक्षण करावयाचे आहे. ३ ते १८ वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण या कालावधीमध्ये केले जाणार असून ३ ते ६ वयोगटाची जबाबदारी महिला व बाल विकास अधिकारी, तर ६ ते १४ वयोगटाची जबाबदारी शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि १४ ते १८ वयोगटाची जबाबदारी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे देण्यात आली आहे. शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम यशस्वी होण्याकरिता तालुकास्तरावर, वॉर्डस्तर समिती, केंद्र व गावस्तर समिती गठीत करण्यात आल्या आहेत. मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी गावागावात पाहणी करावी अशा सूचना गटशिक्षणाधिकारी यांनी दिल्या आहेत.