
सावर्डेतील २ कात कंपन्या ‘बंद’चे आदेश
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश, भुवडवाडीवासियांच्या आंदोलनाला यश
रत्नागिरी:
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील दोन कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे भुवडवाडी आणि परिसरातील ग्रामस्थांना पिण्याच्या दूषित पाण्यासह शेतीचेही नुकसान अनेक वर्षे भोगावे लागते होते. या कात भट्ट्यांमुळे निर्माण होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या विविध त्रासांना सामोरे जावे लागत होते. अखेरीस ग्रामस्थांच्या या आंदोलनाला निलेश राणे यांच्या पाठबळामुळे यश आले असून या दोन्ही कातभट्ट्या ७२ तासात बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दिले आहेत.
ग्रामस्थांच्या या समस्यांची दखल घेऊन भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी या भागाला भेट देत शासनाकडे याचा पाठपुरावा केला होता. सावर्डे येथील कातभट्टीच्या जल आणि वायू प्रदूषणाचा त्रास भुवडवाडी आणि परिसरातील ग्रामस्थांना होत होता. कातभट्टीचे पाणी नाल्यातून थेट नदीमध्ये जात असल्याने येथील नदी पूर्णपणे प्रदूषित झाली होती. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. तसेच बोअरवेल आणि विहीरींना प्रदूषित पाणी येत होते. गेली कित्येक वर्षे हा त्रास ग्रामस्थ सहन करत होते. यासंदर्भात अनेक वेळा आवाज उठवूनही प्रशासन दुर्लक्ष करत होते.
अखेर ग्रामस्थांनी त्यांची व्यथा भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे मांडली. क्षणाचाही विलंब न करता निलेश राणे यांनी सावर्डे भुवडवाडी गाठत अधिकाऱ्यांना बोलावून तेथील वस्तुस्थिती अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती करत निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना भंडावून सोडले. त्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी स्वतः घेऊन जातं असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. ग्रामस्थांना स्वच्छ, शुद्ध पाणी मिळावे आरोग्य चांगले रहावे यासाठी मी स्वतः या गोष्टीचा पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. गोरगरीब जनता दडपणाखाली राहणार असेल तर ते मी होऊ देणार नाही असा विश्वाससुद्धा ग्रामस्थांना निलेश राणे यांनी दिला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी दोन्ही कंपन्या असणाऱ्या परिसरातील व गावातील पिण्याच्या पाण्याची तपासणी केली, त्याचे तपासणी अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना सादर केले. याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने देतानाच या कात भट्ट्यांमुळे प्रदूषण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे दोन्ही कात कंपन्यांचे उत्पादन ७२ तासांच्या आत बंद करण्याच्या सूचना दिल्या असून संबंधित विभागांना पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या निर्णयामुळे काही वर्षे लढत असलेल्या भुवड वाडी आणि परिसरातील ग्रामस्थांच्या लढ्याला निलेश राणे यांच्या पाठबळामुळे यश आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.