
लोकअदालतमध्ये विनाविलंब निर्णय मिळवण्याचा लाभ घ्या
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडून आवाहन
रत्नागिरी : मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे दिनांक २७.०७.२०२४ रोजी रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालय, जिल्हयातील सर्व तालुका न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय लोकअदालतीचे दिनांक २७.०७.२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजन करण्यात येणार आहे.
लोकअदातलतमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांबरोबरच वादपूर्व प्रकरणांमध्ये म्हणजे विदयुत कंपनी, बीएसएनएल, विविध बॅंका, पतसंस्था यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पूर्व प्रकरणे, तसेच नगरपरिषद, ग्रामपंचायत यांचे विविध विभागाचे थकीत रकमेबाबतची प्रकरणे, पोलिस ठाण्यातील अदखलपात्र गुन्हे, वाहतूक विभाग यांनी वाहनावर केलेली दंडात्मक कारवाई, त्याच्या वसूलीची प्रकरणे ठेवण्यात आलेली आहेत. सदरच्या प्रकरणांमध्ये लोकन्यायालयात निवाडा झाल्यास न्यायालयात खटला दाखल करण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यामुळे बॅंका, वाहतूक शाखा, नगरपरिषद, ग्रामपंचायत यांनी न्यायालयीन कामकाजासाठीचा खर्च वाचावा यासाठी लोकअदालतचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक पर्यायी वादनिवारणाचा विचार करत आहेत असे दिसून येते.
मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री. सुनील श्री. गोसावी तसेच वरिष्ठ न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री. निखिल ग. गोसावी यांनी लोकअदालतमध्ये सहभागाचे आवाहन केले असून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
सर्व संबंधित पक्षकारांसाठी २७.०७.२०२४ या दिवशी होणा-या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये एक चांगली संधी चालून आली आहे. त्याचा लाभ घेउन परस्परातील वादांना पूर्णविराम देता येणार आहे. सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवता येईल त्यासाठीच लोकन्यायालयाचा मार्ग निवडण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे.