
रत्नागिरी शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्यासंदर्भात राष्ट्रवादीचे नगरपालिकेला निवेदन
रत्नागिरी : शहरातील जनतेला 24 तास पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी नव्याने राबवण्यात येत असलेली नळपाणी योजनेचे काम गेले सहा वर्ष रडतखडत सुरु असून, रत्नागिरीकरांना 24 तासाऐवजी एक दिवस आड पाणी पिण्याची वेळ आणण्यात आली. त्यामुळे आतातरी जनतेला 24 तास पाणी देतानाच पानवल धरणाचे 1300 मीटर पाईप लाईनचे काम पूर्ण करुन नियोजनाप्रमाणे पाणी द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष निलेश भोसले व माजी नगराध्यक्ष मिलींद किर यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी रत्नागिरी नगर पालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक तुषार बाबर यांना दिले आहे. रत्नागिरी शहरासाठी सुधारित नळपाणी योजना 2016मध्ये मंजूर झाली. त्याची निविदा प्रक्रिया होऊन ऑर्डर देण्यास 2017 साल उजालडले.÷ तेव्हापासून 2024 सालाचे अर्धे वर्ष उलटले तरी 8 वर्ष होऊनही ही नळपाणी योजना पूर्ण झालेली नाही. उलट अनेक कामे अर्धवट ठेवण्यात आली. धरणापासून पंपहाऊसपर्यंत अजूनपर्यंत पाईप लाईन टाकण्यात आली नाही. परंतु ठेका देतानाच अनेक त्रुटी ठेवण्यात आल्या. ज्याने नळपाणी योजनेचे काम केले नाही अशा ठेकेदाराला काम देण्यात आल्यानेच ही योजना रखडल्याचा आरोप मिलींद किर यांनी निवेदनात केला आहे.
शीळ धरणाप्रमाणेच पानवल धरण ते नाचणे फिल्टर हाऊसपयर्र्तची 1300 मीटरची पाईप लाईन अद्याप जोडण्यात आलेली नाही. त्यामुळे यावर्षी फटका बसला. जनतेला 24 तास पाणी देण्याचे आश्वासन देऊनही ते पूर्ण झालेले नाही. यावर्षी 24 तास जनतेला पाणी देण्यात यावे, किमान पावसाळ्यात तरी 24 तास पाणी सुरु करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. नगर पालिकेच्या नियोजनाप्रमाणे पावसाळ्यात शीळ धरणाचे पाणी स्टोअर करावे आणि पानवल धरणातून पाणी पुरवठा करावा अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.