
रत्नागिरी येथे काँग्रेसतर्फे चिखल फेको आंदोलन
रत्नागिरी : रत्नागिरी येथे महाभ्रष्ट शेतकरी विरोधी भाजप सरकार विरोधात काँग्रेस तर्फे चिखल फेको आंदोलन करण्यात आले.
महागाई, बेरोजगारी, पेपर फुटी, महिला सुरक्षा, खते व बियाणांचा कालाबाजार, कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक, चिखलात सुरू असलेली पोलीस भरती, राज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्यासाठी चालवलेली चालढकल, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, श्रीमंतांची पोरं गोरगरिबांना गाड्याखाली चिरडून मारत आहेत, मुलींचे दिवसाढवल्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत, सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, राज्यातील जनता या समस्यांचा सामना करत आहे पण सरकार फक्त टेंडर काढणे निधी वाटणे व कमिशन घेणे एवढेच काम करत आहे त्यामुळे राज्यातील महाभ्रष्ट निष्क्रिय भाजप सरकारच्या विरोधात चिखल लावून चिखल फेको आंदोलन करण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी सांगितले.
राज्यातील व केंद्रातील भाजपचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्यांक, महिला तरुण, गरीब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचे काम या भाजप सरकारने केले आहे. मागील दहा वर्षांपासून भाजप सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खीळ घातली आहे, असा गंभीर आरोप रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हारीस शेकासन यांनी केला.
ते पुढे म्हणाले, सरकारी नोकर भरती केली जात नाही स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत परीक्षा घेतल्या तर पेपर फुटीचे ग्रहण लागते शेतकरी संकटात आहे त्यांना मदत दिली जात नाही आंबा काजू कांदा कापूस सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही. सरकार एम एस पी देत नाही. वादळामुळे नुकसान नुकसान होऊन उध्वस्त झालेल्या मच्छीमाराला कोणतेही मदत नाही. कठीण काळात मच्छीवारांना व शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी भाजप सरकार त्यांचे शोषण आणि आर्थिक पिळवणूक करत आहे, असे उपाध्यक्ष हारीस शेकासन म्हणाले.
जगातील विविध देशात युद्ध थांबवण्याच्या थापा मारणारे आपल्या देशातील “नीट” परीक्षेचे पेपर फुटी व निकालातील गैरव्यवहार थांबू शकले नाहीत ही देशातील लाखो विद्यार्थ्यांकरीता दुर्दैवाची बाब आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य भाजप सरकारने धोक्यात आणले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हे चिखलफेक आंदोलन करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी दिले होते त्यानुसार आज रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने चिखल फेको आंदोलन करण्यात आले यावेळी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हारीस शेकासन, महिला काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष रूपाली सावंत, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत, भटक्या विमुक्त जाती सेलचे प्रदेश सचिव परशुराम खेत्री, मच्छिमार काँग्रेस जिल्हाध्यक्ष इमरान सोलकर, रत्नागिरी तालुका सरचिटणीस काका तोडणकर, रत्नागिरी शहर सचिव जैनुद्दीन भाटकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.