
विभक्त कुटुंब पद्धतीत ज्येष्ठांची अवहेलना थांबवावी: श्रद्धा कळंबटे
रत्नागिरी:- विभक्त कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबातील मुलाबाळांना असलेला ज्येष्ठांचा आधार तुटला असून ज्येष्ठांच्या छळाचाही उद्रेक वाढला आहे. पाल्यांनी उतारवयात ज्येष्ठ नागरिकांना एकटे न टाकता ही संपत्ती आदरपूर्वक जपण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन रत्नागिरी येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कळंबटे यांनी केले.
कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने येथील ज्येष्ठ नागरिक भवनात काल ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जनजागृती दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, वृद्धापकाळातील गरजा लक्षात घेऊन आपल्या हयातीत मालमत्तेचे हस्तांतर करण्याचे ज्येष्ठ नागरिकांनी कटाक्षाने टाळावे. आवश्यक तर कायदेशीर इच्छापत्र करून कुटुंबातील भावी वाद टाळण्यासाठी दक्ष राहावे. अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य सुविधांअभावी ज्येष्ठांची विभक्त कुटुंबात आबाळ होऊन त्यांना वृद्धाश्रमाचा आधार घेण्याची वेळ मुलांनी आई-वडिलांवर येऊ देऊ नये, असे कळकळीचे आवाहन श्रीमती कळंबटे यांनी केले. वारसांकडून छळ होत असेल तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात प्रकरण नोंदवून कायदेशीर न्याय मिळविता येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक अवहेलना प्रतिबंधक अधिनियम २००७ मधील कायद्यांच्या तरतुदीची माहिती पोलीस खात्याच्या प्रतिनिधी सानिका कांबळे यांनी दिली. ज्येष्ठांच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर होणारे हल्ले ही चिंतेची बाब असून ते थांबण्यासाठी पोलीस खाते निश्चित मदतीचा हात देईल, असे सांगून ज्येष्ठांनी आपल्या अडचणी सोडवण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक १०९० अथवा क्रमांक १०० अथवा ११२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थित ज्येष्ठांनी विचारलेल्या शंकांचे निरसन श्रद्धा कळंबटे आणि श्रीमती सानिका कांबळे यांनी केले. जेष्ठांविषयी आपण सदैव आदरपूर्वक तत्पर राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रारंभी संघाचे पदसिद्ध मार्गदर्शक श्यामसुंदर सावंत देसाई यांनी स्वागत केले तर संघाचे अध्यक्ष मारुती अंबरे यांनी ज्येष्ठ नागरिक संघ राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर कासेकर यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला.