
अतिसार, क्षयरोग सारख्या आजारांबाबत जनजागृती करा: जिल्हाधिकारी
रत्नागिरी:- सध्या जिल्ह्यात दि.०६ जून ते २१ जून २०२४ दरम्यान विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा मोहीम सुरू आहे.याबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा बाबत सुकाणू समिती सभा तसेच जिल्हा क्षयरोग फोरम मिटिंग जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आली.विशेष अतिसार नियंत्रण मोहीम तसेच क्षयरोग अंतर्गत कामाचा आढावा घेऊन अतिसार व क्षयरोग यासारख्या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून आकाशवाणीसारख्या वेगवेगळ्या सामाजिक माध्यमांद्वारे जास्तीत जास्त प्रमाणात प्रसिद्धी करून जनतेपर्यंत कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अधिकारी यांना दिल्या.
आजार टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये व तसेच चांगल्या आरोग्यदायी सवयी आत्मसात करून प्रत्येकाने स्वतः बरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी व होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करावा असे आवाहन त्यांनी जनतेस केले आहे. सदर सभेत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेलेया कामाबाबत मा.जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.पल्लवी पगडाल यांनी तसेच क्षयरोग कार्यक्रम सध्यस्थिती व त्याअंतर्गत राबवत असलेल्या योजना बाबत मा.अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र गावडे यांनी माहिती दिली.सदर बैठकीस मा.मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकीरण पूजार, मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये,जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अंकुश शिरसाट,आय.एम.ए.अध्यक्ष डॉ.अतुल ढगे, डेरवन वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.अमेय परांजपे, आदी उपस्थित होते.