
बिबट्याच्या शिकारप्रकरणी आदिवासी व्यक्तीचा शोध सुरु
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे-जाधववाडी येथे वनविभागाच्या पथकाने ‘त्या’ ४ संशयितांकडून हस्तगत केलेली बिबट्याची ८ नखे लांजा येथे ४-५ वर्षांपूर्वी एका आदिवासी व्यक्तीने मुख्य सूत्रधार सचिन रमेश गुरव (रा. गोविळ-लांजा) याला विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. बिबट्याची शिकार करणाऱ्या या आदिवासी व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगजंग पछाडत आहेत. बिबट्याला मारणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीच्या लवकरच मुसक्या आवळू असा विश्वासही वनविभागाच्या पथकाने व्यक्त केला आहे. त्याच्या अटकेनंतरच तस्करी प्रकरणाचा उलगडा होणार आहे.
विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई, सह्यय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीचे परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील व खेडचे वनपाल सुरेश उपरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बिबट्याच्या नखांच्या तस्करीप्रकरणी दिलीप सावळेराम कडलग (घाटकोपर-मुंबई), अतुल विनोद दांडेकर (चेंबूर मुंबई), विनोद पांडुरंग कदम (सावर्डे-चिपळूण), सचिन रमेश गुरव (गोविळ लांजा) यांना जेरबंद करत तस्करी प्रकरणाचा छडा लावला. या तस्करी प्रकरणात सचिन रमेश गुरव हाच मुख्य सूत्रधार असल्याचे वनविभागाच्या तपासात समोर आले आहे. त्यादृष्टीने वनविभागाच्या पथकाकडून त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. बिबट्यांच्या नखांची सचिन गुरव हा अन्य तिघांना ६ लाख रूपयांना विक्री करणार होता, असेही तपासात निष्पन्न झाले आहे. लांजा येथे ४-५ वर्षापूर्वी वास्तव्यास आलेल्या एका आदिवासी व्यक्तीकडून बिबट्याची ८ नखे खरेदी केल्याची कबुली त्याने वनविभागाच्या पथकाला दिली.
त्यानुसार वनविभागाच्या पथकाने बिबट्याची शिकार करणाऱ्या ‘त्या’ आदिवासी व्यक्तीचा शोष घेण्यासाठी कंबर कसली आहे. या आदिवासी व्यक्तीने बिबट्याला नेमके कुठे ठार मारले, याचाही शोध घेण्याचे मोठे आव्हान वनविभागाच्या पथकासमोर आहे. आदिवासी व्यक्ती काही मोजकेच दिवस त्या-त्या गावात वास्तव्य करून निघून जातात. यामुळे बिबट्याची शिकार करणाऱ्या ‘त्या’ आदिवासी व्यक्तीचा लांजा परिसरासह अन्य ठिकाणी कसून शोध घेण्यात येत आहे. हा आदिवासी व्यक्ती लवकरच वनविभागाच्या जाळ्यात सापडेल, असा विश्वासही वनविभागाच्या पथकाला आहे. बिबट्याची शिकार करणाऱ्या आदिवासी व्यक्तीला गजाआड केल्यानंतरच बिबट्याच्या नखांच्या तस्करी प्रकरणाचा खऱ्या अथनि छडा लागणार आहे. बिबट्याची नखे तस्करीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ‘त्या’ चारही संशयितांची १० जून रोजी पोलीस कोठडीची मुदत संपणार आहे. यामुळे वनविभागाच्या पथकाने तस्करी प्रकरणाच्या तपासाला अधिक गती दिली आहे.