
भातबियाणे वेळेपूर्वीच उपलब्ध; शेतकऱ्यांमधून समाधान
चिपळूण : पेरणीची कामे वेळेत व्हावीत यासाठी चिपळूण तालुक्यातील दुकानात भातबियाणे वेळेपूर्वीच उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
बियाणे व इतर शेतीविषयक खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यावर्षी भातबियाण्याच्या दरात २०० रुपये प्रतिबॅग वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्याने भातपिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्रावर भातपिक लागवड करण्यात येते. यापैकी चिपळूण तालुक्यात १३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात येते. यावर्षी वेळेत बियाणे उपलब्ध झाल्याने बियाणे खरेदीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
भातबियाण्याचा पुरवठा तालुक्यातील परवानाधारक विक्रेत्यांकडे झाला आहे. भातबियाण्यामध्ये महाबीज व खासगी कंपनीचे संकरित व सुधारित भातबियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. मान्यताप्राप्त परवानाधारक विक्रेत्यांकडे बियाणे विक्रीला ठेवण्यात आली असून, शेतकऱ्यांची खरेदीसाठी गर्दी होत आहे.
तालुक्यात हळवा, निमगरवा व गरवा या प्रकारातील बियाणांची लागवड होत असल्याने तशी बियाणे बाजारात आली आहेत. पारंपरिक व सुधारित बियाणे उपलब्ध आहेत. सुवर्णा, जया, कर्जत-२, रत्नागिरी ८, वाडा कोलम, चिंटू, साईराम, ज्योतिका, श्री १०१, अभिरूची, रूपाली, कोमल, सोनम, वैष्णवी, पूजा, तृप्ती, शुभांगी इ. सुधारित व संकरित अशा अनेक प्रकारच्या जातीची बियाणे विक्रीस उपलब्ध आहेत.
वाडा कोलम तांदळाला मागणी असल्याने व भाव चांगला मिळत असल्याने तालुक्यात हे बियाणे अधिक प्रमाणात उपलब्ध झाले आहे. बियाणांच्या दरात यावर्षी वाढ झाल्याने पारंपरिक सुवर्णा बियाणाच्या २५ किलोच्या बॅग दरात वाढ झाली आहे. तालुक्यात खते व बियाणांसाठी अधिकृत विक्रेते असून, तेथूनच खतबियाणे खरेदी करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.