
गाडीचा ताबा न दिल्याने रक्कम परत करण्याचे विक्रेत्याला आदेश
रत्नागिरी:गाडीच्या कोटेशनची रक्कम स्वीकारुनही कबूल केल्याप्रमाणे गाडी दिली गेली नाही. ग्राहकाच्या सेवेत त्रुटी ठेवली गेल्याने वाहन विक्रेत्यांविरुद्ध ग्राहक आयोगाने आदेश जारी करत रक्कम अदा करण्याचे आदेश जारी केले आहेत.
सौरभ महादेव माने रा. नाचणे रोड रत्नागिरी यांनी मॅनेजर रिव्हरसाईड होंडा, एमआयडीसी रत्नागिरी, मॅनेजर सुशांत धानल, रसिका मोटर्सकरिता कोल्हापूर, होंडा कोर्स इंडिया गौतम बुद्ध नगर उत्तरप्रदेश यांच्या विरुद्ध रत्नागिरी येथील ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली.
ही तक्रार मंचाचे अध्यक्ष अरुण गायकवाड, सदस्य स्वप्नील मेढे, सदस्या अमृता भोसले यांच्या समोर सुनावणीस आली. सुभाष माने यांच्याकडे असलेली महिंद्रा लोगन ही गाडी जुनी झाल्याने त्यांना नवीन गाडी खरेदी करायची होती. रिव्हरसाईड होंडाचे मॅनेजर प्रदिप कोतवडेकर यांनी होंडा डब्ल्यू आर ही गाडी विकायची आहे असे सांगितले. गाडीची किंमत ८ लाख ४० हजार ठरली. ग्राहक सुभाष माने यांची जुनी गाडी घेऊन नवीन गाडी देण्याचे शोरुममध्ये मान्य करण्यात आले. माने यांनी स्टेट बँक इंडियाकडे कर्ज घेतले. होंडा गाडी खरेदीसाठी विक्रेत्यांना ७ लाख ६५ हजार रु. एवढी रक्कम अदा करण्यात आली. जुन्या गाडीची किंमत ७२ हजार रु. लक्षात घेण्यात आली. विक्रेत्यांना ८ लाख ३७ हजार रु. पोच झाले. ठरवलेल्या दिवशी ग्राहक माने हे गाडी नेण्यासाठी आले. तेव्हा शोरुममधून गाडीचा ताबा मिळाला नाही. यानंतर माने यांनी दिलेल्या नोटीसला ते उत्तर दिले नाही.
माने यांनी रत्नागिरी येथील ग्राहक आयोगात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. तक्रारीत त्यांनी नमुद केले की, होंडा कंपनी किंवा प्रतिनिधीकडून अपेक्षित सेवा मिळाली नाही. सुनावणी अखेर आयोगाने निर्णय दिला की, सामनेवाला एक, दोन, चार यांनी संयुक्तरित्या व वैयक्तिक वाहन व्यवहारापोटी स्वीकारलेली २ लाख ३७ हजार एवढी रक्कम तक्रारदाराला अदा करावी संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत ९ टक्के दराने व्याज अदा करावे, असे आदेशात म्हटले आहे.