
जिल्ह्यात १५८ वाड्यांतील नागरिकांना पाण्यासाठी टँकरचा आधार
रत्नागिरी:जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण असतानाच तीव्र पाणीटंचाईलासुद्धा सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागत असून, पाणीटंचाईचा दाह वाढला आहे. सध्या जिल्ह्यातील ६१ गावांतील १५८ वाड्यांमधील ४३ हजार ९६० लोकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
हवामान विभागाने कोकणात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. मागील पंधरा दिवसांत पारा २८ अंशांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे धरणे, ना-नाल्यांची पात्र कोरडी पडली आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे. डोंगरवस्तीमधील गावांना विहिरींशिवाय पाण्याचा दुसरा पर्याय नसल्यामुळे टँकरची मागणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात दर आठवड्याला टँकरची मागणी करणाच्या गावांमध्ये वाढ होत आहे.
सर्वाधिक टंचाईची झळ चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्याला जाणवत आहे. त्याखालोखाल खेड, रत्नागिरी तालुक्याचा क्रमांक लागतो. राजापूर आणि गुहागर या दोन तालुक्यात अजूनही टँकर सुरू झालेले नाहीत टँकरची सोय होत नसल्यामुळे ग्रामीण भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. काहींना पाणी विकत घेण्यासाठी हजारो रुपये खर्च करत आहेत. खेड, संगमेश्वर, लांजा, चिपळूण तालुक्यांत काही वाड्यांनी टँकरची मागणी केली होती. मात्र, तिथे अजूनही टँकर सुरू करण्यात आलेले नाहीत, याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. सध्या १५८ टैंकरने वाड्यांना पाणी दिले जात आहे. आतापर्यंत ४३ हजार ९६० लोकांना १०९२ टँकरच्या फेऱ्यांनी पाणीपुरवठा करण्यात आला आहे.