
बेकायदा मच्छीमारी प्रकरणी एका नौकेवर कारवाई
रत्नागिरी:- अनधिकृत मच्छिमारीला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने रामभद्र नावाची गस्ती नौका रत्नागिरी जिल्ह्यासाठी निश्चित केली. सुमारे ३ महिने या नौकेने गस्तीसाठीचे काम केले. आणि एका अनधिकृत मच्छीमार नौकेवर कारवाई करण्यात मत्स्यव्यवसाय विभागाला यश आले. नौका मालकाला २० हजार रु. दंड करण्यात आला.
अनधिकृत मच्छीमारी रोखण्यासाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्षा स्थापन करावा ही मागणी मात्र सरकार दरबारी पडून आहे. समुद्र किनाऱ्यावर अनधिकृत मच्छीमारीने धुमाकूळ घातला आहे. प्रचंड प्रमाणात होणाऱ्या अनैतिक मच्छीमारीमुळे सध्या माशांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे मत्स्य प्रक्रिया व्यवसाय अडचणीत सापडला आहे. अनैतिक मच्छीमारी अशीच चालू राहिल्यास येत्या काही कालावधीत समुद्रातून मासे मिळणे जवळपास बंद होईल, असा इशारा कोकण कृषी विद्यापीठाने यापूर्वीच दिला आहे.
अनधिकृत मच्छीमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यसरकारने रामभद्र नावाची नौका रत्नागिरी जिल्हयाकिरता तैनात केली आहे. ६ फेब्रुवारी २०२४ पासून तिचे कामकाजू चालू झाले. सुमारे ३ महिने एवढ्या काळात या नौकेच्या सहाय्याने एका अनधिकृत मच्छीमार नौकेवर कारवाई करणे मत्स्य व्यवसाय विभागाला शक्य झाले आहे. रजनिगंधा या नौकेच्या मालकांना २० हजार रु. एवढा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
अनधिकृत मच्छीमारी प्रामुख्याने १२ समुद्री मैलांच्या पलिकडे होत असते. त्यामुळे तेथे राज्य सरकारला कारवाई करता येत नाही. शिवाय नेहमीची प्रशासकीय कामे सांभाळून कारवाईची कामे करावी लागतात. यामुळे अपेक्षित वेळ देता येत नाही. अनधिकृत मच्छीमारी रोखण्यासाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष सुरु केला पाहिजे असे सांगण्यात आले.