
विल्ये गावातील प्रकाश बाबाजी कांबळे यांच्या धाडसाचे कौतुक, बिबट्याच्या हल्ल्यातून बकरीला वाचविले
रत्नागिरी :तालुक्यातील विल्ये येथील शेतकरी प्रकाश बाबाजी कांबळे यांच्या मालकीच्या ३५ बकऱ्या रानात चरण्यासाठी नेले असता गुरुवार दि.९ मे रोजी सकाळच्या दरम्याने सड्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने कळपातील एका छोट्या बकरीवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता बकऱ्यांचे मालक प्रकाश बाबाजी कांबळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मोठ्या धैर्याने बकरीला वाचवण्यासाठी बिबट्याजवळ धाव घेत आपल्या बकरीचा जीव वाचविला.हा प्रकार दिवसाढवळ्या घडल्याने अनेक शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्याच्या या झटापटीत छोटी बकरी जखमी झाली आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बिबट्याने बकरीवर झडप घालताना बघून प्रकाश कांबळे यांना काय करावे, स्वतः पळावे की बकरीला बिबट्याच्या हल्ल्यातून वाचवावे ? हे काही क्षण कळलेच नाही, अखेर मोठ्या शर्थीने प्रकाश कांबळे यांनी बकरीचा जीव वाचवण्यासाठी मिळेल ते दगड बिबट्यावर फेकण्याचा प्रयत्न केला, मोठमोठ्याने आवाज केला.बकऱ्या सैरावैरा धावू लागल्या,ओरडू लागल्या. हा प्रकार पाहून प्रकाश कांबळे यांचा प्रेशर वाढला तरी प्रयत्नांची पराकाष्ठा करून मोठ्या धाडसाने एका झुडपाचा आधार घेत आपली छोटी बकरी वाचवली. प्रसंगात अनेकांना धाडसी वृत्तीने मदतीचा हात देणाऱ्या विल्ये गावातील प्रकाश बाबाजी कांबळे यांच्या धाडसाचे अनेकांनी कौतुक केले.
या भागामध्ये दिवसाढवळ्या बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. विल्ये भागात शेतकऱ्यांची जीवापाड मेहनत करून जपलेली अनेक वासरे, गुरे मारण्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. बिबट्यांच्या मुक्त वावरामुळे विल्ये मांजरे गावासह जाकादेवी खालगाव परिसरात शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेती कामाची पाळीव जनावरे, तसेच काही पाळीव किमती कुत्रे मारण्याचे प्रकार बिबट्यांकडून घडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. तरी या बिबट्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.प्रकाश कांबळे यांना सेवाभावी आणि धाडसी व्यक्तिमत्त्व म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाते.त्यांच्या प्रसंगावधानाचे अनेकांनी मनापासून कौतुक केले.