
ठाकरे शिवसेनेची रत्नागिरीत ‘मशाल’ रॅली
रत्नागिरी, : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शहरात शुक्रवारी सायंकाळी मशाल रॅली काढण्यात आली. या निमित्ताने वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या या फेरीचे उद्घाटन जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी, राष्ट्रवादीचे बशीर मुर्तुझा, शिवसेना शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी केले. या फेरीमध्ये युवक आणि महिलांचा मोठा सहभाग होता. जयस्तंभ येथून निघालेली फेरी स्वातंत्र्यवीर सावरकर चौकापर्यंत काढण्यात आली. या फेरीने शहरभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आवाज लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न झाला. फेरीचे मुख्य आकर्षण क्रांतिगीत हे होते. लोकांमध्ये चेतना निर्माण करण्याच्या उद्देशाने हे गीत या फेरीत लावण्यात आले होते. या फेरीचे स्वरूप भव्य असे करण्याचा प्रयत्न ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. ‘जय भवानी, जय शिवाजी..’चा जयघोष करत हाती पेटलेल्या मशाली घेऊन कार्यकर्ते या फेरीत सहभागी झाले होते. या जयघोषाने रत्नागिरी शहर दुमदुमून गेले. शहरातील राम आळी, धनजीनाका, मुख्य बाजारपेठेतील परिसरात फेरीचे जोरदार स्वागत करण्यात आले. ठाकरे शिवसेनेच्या आणि विनायक राऊत यांच्या डीजेवरील गाण्यांची चर्चा शहरात रंगली होती. लोकसभा निवडणुकीची प्रचार यंत्रणा ग्रामीण भागात राबवली जात आहे; मात्र शहरात वातावरण निर्मितीसाठी सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या फेरीचे आयोजन केल्याचे आयोजक बंड्या साळवी यांनी सांगितले.