
बोगस बियाणे वाटप झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करणार
रत्नागिरी :बियाणे, कीटकनाशकांच्या बाबतीत जिथे तक्रार येईल तिथे लगेच तपासणी करून अहवाल तयार करावेत. त्याचप्रमाणे बोगस बियाणे बाजारात येऊ नयेत, यासाठी लक्ष ठेवावे. बोगस बियाणे आढळल्यास तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना कृषी विभागाने केल्या आहेत.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने या वर्षी सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, ही बाब समाधानाची आहे. त्यामुळे विभागाने कृषी विकासासाठी लघुकालीन आणि दीर्घकालीन कार्यवाहीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. नैसर्गिक शेतीचे प्रमाणीकरण आणि त्यासाठी परिसंस्था निर्माण केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला चालना मिळणार नाही. त्यादृष्टीने यंदाचे खरिपाचे नियोजन करण्यात आले आहे.
खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील, यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. खतनिर्मिती कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत बफर साठ्यासाठी त्यांना निश्चित करून दिलेला पुरवठा करावा, खतांच्या वाहतुकीबाबत योग्य ते नियोजन करावे, युरिया खताच्या पुरवठ्याबाबत नियोजन करावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.