
लोकांना विकास हवा आहे, तो मोदींच्या काळात झाला – विनोद तावडे
रत्नागिरी : संविधान धोक्यात असल्याचा अपप्रचार करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आपल्या काळात 80 वेळा संविधान बदलले. संविधानात बदल करण्याचे भाजपाच्या सुतराम डोक्यात नाही. परंतु संविधान बदलण्यावर काँग्रेसने बोलूच नये, असा पलटवार भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केला. तर सहानुभुतीचा कोणालाही फायदा होणार नाही. लोकांना विकास हवा आहे, तो मोदींच्या काळात झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी दौऱ्यावर असताना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभा सहप्रभारी बाळासाहेब माने, माजी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, सचिन वहाळकर उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले की, भाजपा आणि मोदी सरकारने संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी संविधानाची प्रत समोर ठेवून भाजपाने संकल्पपत्र घोषित केले. संविधानात बदल करण्याचे भाजपाच्या सुतराम डोक्यात नाही. मात्र, दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवारच अशा प्रकारची भाषा करत आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्यास काही मिळाले नाही की, विरोधकांकडून विशेषतः काँग्रेसकडून, अशी विधाने होतात, या शब्दांत विनोद तावडे यांनी काँग्रेसच्या टीकेचा समाचार घेतला.
आपल्या राज्याची प्रगती कशात आहे याचा विचार व्हायला हवा. महाराष्ट्राच्या जनतेला मोदी सरकारमधून काय मिळाले हा मुद्दा महत्त्वाचा आहे. करवाटपात महाराष्ट्राला मिळालेला अधिकचा वाटा, अनुदानात मिळालेली अधिकची रक्कम हे महाराष्ट्राला मिळाले. 11 हजार 711 कोटी रुपये बिनव्याजी कर्ज केंद्राने महाराष्ट्राला दिले. मोदी सरकारकडून राज्याला काय मिळाले याचा विचार होणे गरजेचे आहे. राज्याला 253 टक्के अनुदानाच्या रूपाने आले. याचा जनतेने विचार करायला हवा. आपल्या राज्याची प्रगती कशात आहे, याचा विचार व्हायला हवा, असे आवाहन विनोद तावडे यांनी केले.
दरम्यान, काँग्रेस एका बाजूला रोजगार नाही, असे म्हणत आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपाने पंतप्रधान आवास योजनेतून 4 कोटी घरे बांधली. ही घरे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खिशातून बांधली नाहीत. त्यासाठी लागलेल्या साहित्यात हजारो व लाखो लोकांना रोजगार मिळाला. पीएम आवासमध्ये महाराष्ट्राला 27 लाख घरे तसेच शौचालये बांधली आहे. आयुष्यमान भारत योजनेत कार्ड दिले आहे, अन्नधान्य दिले जात आहे, असे तावडे यांनी सांगितले.