
आचारसंहितेबाबत राजकीय पक्षांना केले मार्गदर्शन
जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह; आचारसंहितेचे काटेकोर पालन करा
रत्नागिरी,: आचारसंहिता लागू झाल्याने काय करावे आणि काय करु नये, उमेदवारी अर्ज कसा भरावा, याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन सविस्तर मार्गदर्शन केले. सर्वांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, लाच देणे, अवाजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकदपटशा दाखविणे याबाबत तक्रारी असल्यास संनियंत्रण कक्षातील १९५० या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली.
जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, भारत सरकारच्या पोर्टलवर याबाबत सर्व सविस्तर माहिती आहे. त्याचाही संदर्भ म्हणून वापर करावा. विशेषत: उमेदवारी अर्जाबाबत आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी. वयस्कर तसेच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा करण्यावर भर दिला आहे. राजकीय पक्षांनी बुथनिहाय प्रतिनिधी नेमावेत. सर्वांनीच आचारसंहितेचे काटेकारे पालन करावे. लाच देणे, अवाजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकदपटशा दाखविणे याबाबत काही तक्रारी असतील तर जिल्ह्याच्या तक्रार संनियंत्रण कक्षातील १९५० या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. हा कक्ष २४ तास सुरु आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी आठ प्रकारचे आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे सर्वांनी काटेकोर पालन करावे. त्यानुसारच परवानगीदेखील घ्यावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी सांगितले. यानंतर खर्चाचे दर ठरविण्याबाबत बैठक झाली. बैठकीला जिल्हा परिषदचे वित्त व लेखा अधिकारी उत्तम सुर्वे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण, अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त डी. आर. शिंदे आदी उपस्थित होते.