
गोगटे कॉलेजच्या ऋणानुबंधचा सुवर्णमहोत्सवी स्नेहमेळावा
रत्नागिरी : चक्क ७० ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ महिलांनी तरूणाईच्या जोषात कोळीगीत नृत्य सादर करून, इतर ज्येष्ठांनी आपले आयुष्य कसे तणावमुक्त आनंदात घालवावे, याचा धडा घालून दिला. निमित्त होते गोगटे महाविद्यालयाच्या १९७४ च्या बी. ए. बॅचच्या ऋणानुबंध परिवाराच्या सुवर्णमहोत्सवी स्नेहमेळाव्याचे.
येथील गोगटे महाविद्यालयाच्या ऋणानुबंध परिवार १९७४ च्या बी. ए. बॅचचा सुवर्णमहोत्सवी स्नेहमेळावा नरबे येथील सुरभि अॅग्रो रिसॉर्टच्या निसर्गरम्य परिसरात उत्साहात पार पडला. यावेळी ७० ते ७५ वयोगटातील सुमारे ३० ज्येष्ठ नागरिकांनी तरुणाईच्या उत्साहात विविध उपक्रम साजरे करून आपल्या विद्यार्थीदशेतील आठवणींना उजाळा दिला. गोगटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गौस्वामी आणि अन्य प्राध्यापकांनी ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचे अगत्यपूर्वक स्वागत केले. त्यानंतर गोगटे महाविद्यालयाचे विविध उपक्रम आणि प्रगती याबाबत प्राचार्यांनी माहिती दिली. यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसराची पाहणी करून आपल्या आठवणींना उजाळा दिला. ऋणानुबंध परिवाराच्यावतीने राजेंद्र सावंत यांनी प्राचार्य, प्राध्यापक व उपस्थित कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले.
नरबे येथील सुरभि अॅग्रो रिसॉर्ट येथे दोन दिवस विविध उपक्रम, मनोरंजन कार्यक्रम, स्पर्धा, सत्कार आदि कार्यक्रम उत्साहात पार पडले. रत्नागिरी येथे नुकत्याच झालेल्या जिल्हा मॅरेथॉन स्पर्धेत ७० वर्षांच्या निला दामले यांनी प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत साडी नेसून धावणाऱ्या त्या एकमेव स्पर्धक होत्या. तसेच डॉ. विजया जोशी यांचाही सत्कार करण्यात आला. या स्नेहमेळाव्याला सुरभि रिसॉर्टचे मालक बच्चू सावंत यांनी लक्षणीय सहकार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
ऋणानुबंध परिवाराचे गेली ८ वर्षे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्नेहमेळावे आयोजित करून, मित्रमैत्रिणींच्या सुखदुःखात सक्रीय साथ देण्यात येते. कोरोनाच्या काळात मृत्यू पावलेल्या मित्रांच्या परिवारांना भरीव आर्थिक मदत, शैक्षणिक उपक्रमात सहकार्य असे विविध उपक्रम ऋणानुबंधच्यावतीने राबवले जातात. यावर्षी स्नेहमेळाव्यामध्ये चक्क ७० ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठांनी सुंदर कोळीनृत्ये सादर करून सर्वांना चकीत केले. तसेच नटसम्राट, वेडा वृंदावन या नाटकातील भावस्पर्शी स्वगत सादर करून, ज्येष्ठ नागरिकांनी वातावरण भारावून टाकले.
राजेंद्र सावंत, राजन खानविलकर, माया शिंदे, रमेश सुर्वे, गजानन नाईक, शरद नातू यांनी सर्वांच्या सहकार्याने या स्नेहमेळाव्याचे नेटके आयोजन केले होते. या स्नेहमेळाव्यात अनुया पेडणेकर, अपर्णा चिटणीस, शमीम मुकादम, विद्या मांडके, निता आरेकर, प्रतिभा मराठे, शैला खानोलकर, उषा जोशी, मिना दाबके, रजनी आचरेकर, सुचिता बंदरकर, निला जोशी, सुप्रिया मयेकर, इंद्रायणी प्रभुदेसाई, पद्मजा शितोळे, निसार नाईक, भालचंद्र करंदिकर, मनोहर पोतदार, रजनी जाधव यांनी सहभाग घेतला.