
अनेक पक्षाच्या नेत्यांनी घेतली उध्दव ठाकरेंची भेट
रत्नागिरी, : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा झाल्यानंतर रत्नागिरीत नवी राजकीय समिकरणे जुळू लागल्याचे दिसून आले. व्यासपिठावर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा, राजन सुर्वे आदींनी ठाकरेंची सभास्थानी भेट घेतली. आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी ठाकरे गेल्यानंतर तिथेही मिलिंद कीर, भाजपचे नेते राजू कीर, आम आदमी पार्टीचे परेश साळवी यांनीही उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
ठाकरे यांनी कुटुंब संवाद हा कार्यक्रम आटोपून त्यांनी झाडगाव एमआयडीसी येथील आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी दुपारचे भोजन केले. या ठिकाणी शरद पवार गटाचे नेते कुमार शेट्ये, मिलिंद कीर, सनिफ गवाणकर यांनी ठाकरे यांची भेट घेतली. खासदार विनायक राऊत यांनी मिलिंद कीर यांची ओळख करून दिली तेव्हा मी त्यांना ओळखतो, असे ठाकरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा हे मेळाव्याच्या ठिकाणी व्यासपिठावरही उपस्थित होते. मेळावा संपल्यानंतर ठाकरेंसह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आमदार वैभव नाईक, आमदार भास्कर जिल्हाप्रमुख विलास जाधव, चाळके, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक साळवी यांच्या निवासस्थानी गेले. ठाकरेंचे भोजन झाल्यानंतर दरवाजा उघडताच प्रत्येकजण त्यांच्या भेटीसाठी आटापिटा करत होता. भाजपचे नेते राजू कीर हे भंडारी समाजाचेही नेते आहेत. समाजासंदर्भातील काही मागण्या घेऊन ते उद्धव ठाकरे यांना भेटले. भगवती किल्ल्याच्या बदललेल्या नावासंदर्भात त्यांनी ठाकरेंशी चर्चा केली. या वेळी दानशूर भागोजीशेठ कीर यांचे नातू अंकूर कीर हेही उपस्थित होते. आपचे परेश साळवी यांच्यासह तेली समाजाचे नेते सचिन लांजेकर हेही आले होते.
महाविकास आघाडी भक्कम करण्यासाठी प्रयत्न
दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते तथा कोकण निरीक्षक भाई जगताप यांनी रत्नागिरी दौरा केला. त्या वेळी आघाडीचा कोणताही उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी मेहनत घ्यावी, असे आवाहन बैठकीत केले होते. आता ठाकरेंच्या दौऱ्यातही राष्ट्रवादीचे नेते दिसल्याने महाविकास आघाडी आणखी भक्कम करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.