
येणाऱ्या निवडणुकीत जनता गद्दार ना त्यांची जागा दाखवून देईल – भाई जगताप
रत्नागिरी :राम मंदिर उदघाटन असो की 1 फेब्रुवारीला झालेले बजेट असो यामुळे 25 मेपर्यंत मोदी सरकार राहील की नाही ही शंका असून, त्यांना एवढी घाई झाली आहे की, मार्च मध्येच निवडणुका लागण्याची शक्यता काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांनी सांगितले. ज्या पध्दतीने गुंडगिरी करुन, पैशाचा वापर करुन, लोकशाहीने निवडून आलेले सरकार पाडण्यात आले. त्यामुळे येथील सर्वसामान्य नागरिक खवळलेला आहे. महाराष्ट्रातील नागरिक गद्दारी सहन करीत नाही, येणार्या निवडणुकीत ही जनता दाखवून देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठकीसाठी आलेल्या आ. भाई जागताप यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, डोळ्यासमोर आता लोकसभा निवडणुका असून, राम मंदिराचे उद्घाटन घाईघाईने करुन घेणे आणि त्याचा फायदा लोकसभेला उठवणे या एकाच उद्देशाने हे उदघाटन करण्यात आले आहे हे स्पष्ट होत आहे. एप्रिलमध्ये गतवेळी निवडणुका झाल्या होत्या. 25 मेला मोदींचे दुसर्यांदा नवीन सरकार स्थापन झाले. यावेळी तेवढाही काळ हे सरकार राहील की नाही हे शंका आहे. नुकतेच झालेले बजेट व त्यानंतर झालेली जुमलेबाजी यामुळे हे दिसून येत आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका कदाचित मार्चमध्येच होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील 48 मतदार संघामध्ये काँग्रेसने निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यात मला रत्नागिरी-सिंधुदुर्ग व रायगड मतदार संघ देण्यात आला आहे. त्यामुळे बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार काँग्रेसला काय करता येईल याचा आढावा घेण्यासाठी या बैठका आहेत. त्याची सुरुवात रत्नागिरीपासून करण्यात आली आहे. या प्राथामिक बैठका आहेत. यात जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांचीच सध्या भेट असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत याठिकाणी प्रतिनिधीत्व करीत असून निवडून येत आहेत. परंतु आघाडी म्हणून काँग्रेसचा त्यांना कसा फायदा होईल याचा आढावा घेण्यासाठी या बैठका घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
एकेकाळी रत्नागिरीत सहा आमदार काँग्रेसचे होते. तो सुवर्णकाळ होता. त्यानंतर काँग्रेसची झालेली फूट, राष्ट्रवादी झाल्यानंतर काँग्रेसचे वैभव कुठेतरी कमी झाले असल्याची जाणिव आपल्याला असून वरिष्ठांनाही याची कल्पना दिली असल्याचेही भाई जगताप यांनी सांगितले.
बदलत्या राजकीय परिस्थितीत वरिष्ठांच्याही लक्षात आले आहे. विधानसभेला मुंबई वगळून 72 जागा कोकणात निर्णायक असतात. ही वेळ आता युध्दाची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या आधारे मतांचे हे युध्द आहे. कोकण या निवडणुकीत आपली निर्णायक मत दाखवून देईल असे त्यांनी सांगितले.
कोवीडमध्ये सर्वात चांगले काम महाराष्ट्र सरकारने केले. त्यावेळी आव्हाने वेगळी होती. त्यामुळे प्रशासनाचा फारसा कालावधी मिळाला नाही. ज्या पध्दतीने गुंडगिरी करुन, पैशाचा वापर करुन, लोकशाहीने निवडून आलेले सरकार पाडण्यात आले. त्यामुळे आता खर्या अर्थाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताकद व बळ देण्याची गरज आहे. या गोष्टींबाबत आपण वरिष्ठांशी बोललो आहे. महाराष्ट्रातील नागरिक गद्दारी सहन करीत नाही, येणार्या निवडणुकीत महाविकास आघाडी सत्तेत येईल. त्यामुळे सत्ता आल्यावर नक्की सर्वांनाच बळ दिले जाईल असा विश्वास भाई जगताप यांनी व्यक्त केला.
आताचे राजकारण खालच्या पातळीचे व गढूळ झाले आहे. महाविकास आघाडी वेगळ्या पध्दतीने विचार करते. आजच्या घडीला व्यापारी सरकारने घटनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. देशाची लोकशाही वाचवणे याचसाठी सर्व एकत्र आले असून हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाही याकडे आम्ही लक्ष दिले आहे. पुढील विधानसभेला वेगळे निकष लागतील असा विश्वास भाई जगताप यांनी व्यक्त केला.