
रत्नागिरीला मातोश्रीसोबत जोडणारे सेनेचे महत्वाचे पद रिक्त
पक्षप्रमुखांच्या दौऱ्यापुर्वी जिल्हा संपर्क प्रमुख निवड होण्याची शक्यता
रत्नागिरी :शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ५ फेब्रुवारीला रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. मात्र, या महत्वाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याला थेट मातोश्री सोबत जोडणारे जिल्हा संपर्क प्रमुख हे पदच मागील अनेक दिवसांपासून रिक्त आहे. मातोश्री वरील आदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा संपर्क प्रमुख पद महत्वाचे मानले जाते. आता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी हे पद भरले जाणार का? याकडे लक्ष लागले आहे.
सुधीर मोरे यांच्या निधनानंतर मागील अनेक महिने जिल्हा संपर्क प्रमुख हे पद रिक्त आहे. मातोश्री वरून आलेला आदेश, पक्षाने जाहीर केलेली ध्येय धोरणे जिल्ह्यात राबवून घेण्यासाठी जिल्हा संपर्क प्रमुख हे पद महत्वाचे मानले जाते. शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांच्या निधनानंतर हे पद रिक्त आहे. मोरे यांनी जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत रहावी, यासाठी मातोश्रीवर निघाणाऱ्या आदेशाची योग्य पेरणी केली होती. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना अजूनही मजबूत आहे. ग्रामीण भागात सेनेची ताकद अद्यापही शाबूत आहे. राज्यात शिवसेनेत उभी फुट पडली. त्यामुळे सेनेचे दोन भाग झाले असले तरी मुळ शिवसैनिक काहीशा संभ्रमावस्थेत आहे. परंतु उद्धव ठाकेर यांच्या भावनिक खेळीने हा शिवसैनिक अजूनही ठाकरेंबरोबर असल्याचे दिसते. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये शिवसेनेचे विभाजन झाल्यामुळे मोठी राजकीय स्पर्धा निर्माण झाली आहे. मुळ शिवसैनिक टीकुण रहावा यासाठी पक्षाकडुन जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
मातोश्रीवर होणारे निर्णय जिल्ह्यात यावे, यासाठी मुंबईतीलच मातोश्रीच्या जवळील व्यक्तीला जिल्ह्याचा
संपर्क प्रमुख म्हणून नियुक्त केले जाते. सुधीर मोरे यांनी संपर्क प्रमुख म्हणून चांगले काम केले होते. पक्षात फुट पडल्यानंतर पक्षा बांधुन ठेवण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकाही झाल्या होत्या. परंतु एन पक्षफुटीनंतरच त्यांचा मृत्यू झाला आणि शिवसेनेसाठी महत्त्वाचे असलेले हे पद रिक्त झाले. आदित्य ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वीच खळा बैठका घेतल्या. तेव्हा देखील या पदाची उनिव भासली.
आता पक्षप्रमुख उद्धव ठाकेर रत्नागिरी, सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. या स्थितीत देखील शिवसेनेला जिल्हा संपर्क प्रमुखाची प्रतिक्षा आहे. सहसंपर्क प्रमुख म्हणून राजेंद्र महाडिक काम करीत आहेत. त्यांची जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती व्हावी, अशी अनेकांची मागणी आहे. मुंबईतील श्री. पडळकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यापुर्वी किंवा दौऱ्यात ही नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.