
निवळी येथे बिबट्याची वनविभागाने केली सुटका
रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी येथे एका घरामध्ये आलेल्या बिबट्याची वन विभागाने सुटका केली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. भरवस्तीत बिबट्या आल्याने निवळी पंचक्रोशीत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. निवळी येथील कातळवाडी येथे आज दि.३१ जानेवारी रोजी पहाटे ४.१० वाजणेच्या सुमारास जयराम रा. मोरे यांचे घराच्या मागील बाजूस असलेल्या पडवीमध्ये बिबट्या आल्याची माहिती पोलीस पाटील निवळी यांनी भ्रमणध्वनीव्दरे वनपाल सावर्डे यांना दिली. यानुसार वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकामधील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता सदरचा बिबट्या हा कोंबड्याच्या वासाने राहते घराचे मागील बाजूस असलेल्या (पडवी) खोलीमध्ये बसला असल्याचे दिसून आले. सदरचे खोलीचे दारवरती अर्ध्याभागावर लाकडी फळ्या व पत्र्याने बंद करुन दारासमोर पिंजरा लावून बिबट्या सुखरुप जेरबंद करण्यात यश आले.
त्यानंतर घरामध्ये आलेल्या बिबट्याला पिंजऱ्यामध्ये सुरक्षीतरित्या ताब्यात घेतल्यानंतर पशूवैद्यकीय अधिकारी चिपळूण यांनी पाहणी केली असता सदरचा बिबट्या हा साधारणपणे २.५ ते ३ वर्षाचा असून ती मादी असून तीला नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे करिता सुस्थितीत असलेची खात्री झाल्याने वन विभागाचे बचाव पथकाने सदर बिबट्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. सदरचे बचावकार्य विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे, व सहाय्यक वनसंरक्षक, रत्नागिरी (चिपळूण) वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीम. राजश्री चं कीर, वनपरिक्षेत्र अधिकारी चिपळूण, व त्यांचे अधिनस्त कर्मचारी उमेश आखाडे वनपाल सावर्डे, अनंत मंत्रे वनरक्षक नांदगाव, श्रीम. अश्विनी जाधव वनरक्षक गुढे, दत्ताराम सुर्वे वनरक्षक, राहूल गुंठे वनरक्षक कोळकेवाडी, नंदकुमार कदम वाहनचालक व गणेश भागडे तसेच रेस्क्यू बचाव पथकामध्ये पोलीस विभागाचे अधिकारी, स्थानिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरता वनविभागाचा टोल फ्रि क्र.१९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत केले गेले आहे.