
योग्य शिक्षण दिले तरच आदर्श समाज घडतो: बाळासाहेब माने
लांजा:-
राज्यातील गोरगरीब विध्यार्थ्यांना आश्रम शाळेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याचे काम हेरिटेज संस्था करीत असून यामुळेच या शाळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेश घेत असून योग्य वेळी योग्य शिक्षण दिले तरच आदर्श समाज घडतो आणि हे योग्य शिक्षण देतानाच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी संस्थेने केलेले प्रयत्न निश्चित्तच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी आमदार बाळासाहेब माने यांनी बुधवार दि.२४ रोजी न्यू इंग्लिश स्कूल जावडे येथे केले.
हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल जावडे तसेच प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा जावडे या तीनही शाळांच्या वार्षिक पारितोषिक वितरण व संगणक कक्षाचे उदघाटन माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्त्या उल्का विश्वासराव, संस्थेच्या अध्यक्षा ऍड. अपर्णा पवार, संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कांबळे, खजिनदार संदीप तावडे,सामाजिक कार्यकर्ते विजय कुरूप, चंद्रकांत मांडवकर, बाबा दळी, माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक गजानन पांचाळ, प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक शिवप्रसाद ताटके, जावडे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तीनही शाळातील सुमारे ३५० विद्यार्थ्यांना राज्य, विभाग, जिल्हा, तालुका व शाळा स्तरावरील विविध स्पर्धेतील यशाबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच यावेळी संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या अद्ययावत संगणक कक्षाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार बाळासाहेब माने यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की स्पर्धेच्या युगात मुलांच्या शारीरिक वाढी बरोबर त्यांना वाचन, लिखाण आणि पाठांतर आलेच पाहिजे आणि याकडे लक्ष देतानाच सर्व सोयीसुविधा देण्यासाठी संस्था म्हणून संतोष कांबळे आणि अपर्णा पवार हे दाम्पत्य सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून करीत असलेले काम प्रेरणादायी असून भविष्यात ही मुले आत्मनिर्भर होऊन समाजाची नक्कीच काळजी घेतील असा विश्वास देखील बाळासाहेब माने यांनी व्यक्त केला .
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या उल्का विश्वासराव, संस्थापक संतोष कांबळे, अध्यक्षा अपर्णा पवार यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व मान्यवरांच्या हस्ते सुमारे ३५० विद्यार्थ्यांना वर्षभरात विविध स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.