
रत्नागिरीच्या 12 ट्रेकर्सनी साडेबारा हजार फूट उंचीवरील ‘केदारकंठ’ शिखर केलं सर
राजापूर : काही ठिकाणी उणे १० अंश सेल्सिअस, काही ठिकाणी १२ अंश सेल्सिअस, तर काही ठिकाणी १६ अंश सेल्सिअस तापमान अशा प्रतिकूल परिस्थितीत रत्नागिरीतील जिद्दी माउंटनिअरिंग रत्नागिरी असोसिएशनच्या १२ ट्रेकर्सनी तीन दिवसांचे ट्रेकिंग करत हिमालय पर्वतरांगातील सुमारे १२ हजार ५०० फूट उंचीवरील केदारकंठ शिखर जिद्दीने सर केले.
यामध्ये ट्रेन, बसच्या प्रवासाबरोबरच डेहरादून ते संकरा व्हिलेज असा टेम्पो ट्रॅव्हल्सने केलेला प्रवास, प्रतिकूल हवामानाशी जुळवून घेण्यामध्ये आणि ट्रेकिंगला जाण्यापूर्वी केलेला नियमित सराव महत्त्वपूर्ण ठरल्याची माहिती ट्रेकर्स शामसुंदर शेट्ये यांनी दिली.
या ट्रेकिंगसाठी देशभरातील १४ कंपन्यांचे सुमारे २०० ट्रेकर्स सहभागी झाले होते. त्यामध्ये जिद्दी असोसिएटचे प्रमुख अरविंद नवेले यांच्या मार्गदर्शनाखाली मंदार सावंत, संतोष काटकर, स्विटी बेंद्रे, शामसुंदर शेट्ये, शीतल शेट्ये, हेमंत खटीक, प्रतीक माळी, रोहन शिवलकर, श्रुती सावंत, जिद्दी असोसिएटचे मार्गदर्शक प्रसाद शिवगण, नेहा घाणेकर सहभागी झाले होते. हिमालय पर्वतरांगातील सुमारे १२ हजार ५०० फूट उंचीवरील केदारकंठ शिखर करण्याच्या ट्रेकिंगसाठी रत्नागिरी येथील ट्रेकर्सनी २० ते २९ जानेवारी असा प्रवास केला.
त्यामध्ये प्रत्यक्षात केदारकंठ शिखरावर तीन दिवस ट्रेकिंग करून हे शिखर गाठले. यासाठी संकरा व्हिलेज ते जुडा का तालाब ते केदारकंठ बेस कॅम्प येथून रात्री २ वा. केदारकंठ समिटसाठीचा प्रवास सुरू झाला. प्रतिकूल हवामानाशी जिद्दीने सामना करत त्यांनी हा अवघड ट्रेक पूर्ण करत केदारकंठ समिटचा पहिला मान पटकावला.
रत्नागिरी येथील जिद्दी असोसिएटचे प्रमुख अरविंद नवेले यांच्या मार्गदर्शनाखाली केदारकंठ शिखर ट्रेकिंग करण्याचा निर्धार सहभागी सर्वांनी केला. त्यानुसार नियमित वर्कआऊट करून तयार झालेल्या शारीरिक आणि मानसिक सक्षमतेचा प्रत्यक्ष ट्रेकिंगसाठी उपयोग झाला. तीन टप्प्यांमध्ये केलेल्या या ट्रेकिंगमध्ये काही ठिकाणी उणे तापमान होते. त्यामुळे प्रतिकूल स्थितीचा सामना करावा लागला. मात्र, केदारकंठ शिखर गाठल्यानंतर साऱ्यांना अत्यानंद झाला. ट्रेकिंगचा हा प्रवास निश्चितच खूपच रोमांचकारी आणि आनंदादायी होता.