
पर्यटनासाठी सांगलीहुन गणपतीपुळेत आलेली महिला बेपत्ता
रत्नागिरी :गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात रवीवारी सांगली वरून आलेल्या ५७ वर्षीय महिला गायब झाल्याने गणपतीपुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की गणपतीपुळे पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार सौ. सुनीता रामचंद्र पाटील उर्फ निकिता या गणपतीपुळे येथे आपल्या मैत्रिणींसह पर्यटनासाठी आल्या होत्या. मात्र गणपतीपुळे येथे देवदर्शन झाल्यानंतर त्या सर्वजणी गणपतीपुळे समुद्रामध्ये समुद्रस्नान करण्यास गेल्या होत्या. समुद्र स्नान चालू असताना सौ सुनीता या अचानक गायब झाल्याने त्यांच्याबरोबर असणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
याबाबत आलेल्या महिलांनी त्यांच्या राहत्या घरी संपर्क करून त्यांच्या पतीला सदरची माहिती दिल्यानंतर त्यांचे पती गणपतीपुळे येथे दाखल झाले.
श्री.रामचंद्र आबा पाटील यांनी आपली पत्नी गणपतीपुळे समुद्रावरून गायब झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली असून सदरची महिला ही गणपतीपुळे समुद्रामध्ये आपल्या मैत्रिणींसह समुद्र स्नान करत असताना अचानक गायब झाल्याने त्यांच्या मैत्रिणीने इकडे तिकडे शोधा शोध करत असताना सुनीता या कोठेही आढळून न आल्याने त्यांनी संबंधित नातेवाईकांकडे फोन करून सदरच्या घटनेची माहिती दिली.
त्यानंतर रामचंद्र आबा पाटील यांनी गणपतीपुळे पोलीस स्थानकामध्ये आपली पत्नी हरवली असल्याची नोंद केली.
जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील या आपले सहकारी सहाय्यक पोलीस फौजदार श्री संदीप साळवी,पोलीस नाईक जयेश कीर,पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुरव आदी तपास करत आहेत.